वे तोडेंगे...हम जोडेंगे
..................
प्रगती बाणखेले
pragati.bankhele@timesgroup.com
..................
नागपाड्यातला मोरलँड रोडवर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी रात्री १०-१५ बायका या रस्त्यावर येऊन बसल्या. दिल्लीतल्या शाहीनबाग आंदोलनाला पाठिंबा म्हणून. संख्या वाढत गेली. त्यांना कुणी निमंत्रण दिलं नव्हतं. कुणी आवाहन केलं नव्हतं. या मुंबईबाग आंदोलनाला येत्या बुधवारी एक महिना पूर्ण होतोय...
....................
नागपाड्यातला मोरलँड रोड. रस्त्याच्या दोन्ही बाजूला फडकणारे तिरंगे. पोलिसांची व्हॅन उभी आहे. पुढे काम सुरू असलेला रस्ता. एका बाजूचं काँक्रिटीकरण पूर्ण झालंय. दुसऱ्या बाजूचा रस्ता खोदून ठेवलेला दिसतो. कोकणी कम्युनिटी हॉलसमोर अर्ध्या रस्त्यावर बसलेल्या बहुतांश बुरखेधारी महिला. एक तरुण गट 'आजादी'च्या घोषणा देतोय. बाकी थोड्या विखरून बसल्यात. 'मुंबईबाग' असं लिहिलेला एक मोठा ठळक बोर्ड लक्ष वेधून घेतो. त्यावर भारत सरकारला 'सीएए' मागे घेण्याचं 'एनपीआर' आणि 'एनआरसी' थांबवण्याचं आवाहन केलं आहे. कुठेच मोठे होर्डिंग नाहीत. तिरंग्याशिवाय इतर झेंडे नाहीत. महात्मा गांधी, राणी लक्ष्मीबाई, छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावलेत. दोघीजणी माझी अस्खलित इंग्रजीत चौकशी करतात. मी येण्याचं कारण सांगते. ओल्या काँक्रिटच्या रस्त्यावर अंथरलेल्या पातळशा लाल जाजमावर बसलेल्या बायका बोलू लागतात…
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी रात्री १०-१५ बायका या रस्त्यावर येऊन बसल्या. दिल्लीतल्या शाहीनबाग आंदोलनाला पाठिंबा म्हणून. संख्या वाढत गेली. त्यांना कुणी निमंत्रण दिलं नव्हतं. कुणी आवाहन केलं नव्हतं. कुणी ट्रक, बसमधून घेऊन आलं नव्हतं. आधी भायखळा, नागपाडा परिसरातून बायका येत होत्या. नंतर हा परिघ जेजे परिसर, माहीमपर्यंत पोहोचला. आता तर मुंबईच्या वांद्रे, जोगेश्वरी, कांदिवली, अंधेरी, गोवंडी, मानखुर्द, कुर्ल्यामधूनही बायका येतात. किमान साडेतीन हजार ते कमाल आठ हजारांपर्यंत बायका इथे दिवसभर हजेरी लावतात.
मुंबईबाग आंदोलनाला येत्या बुधवारी एक महिना पूर्ण होतोय. इथं येणाऱ्यांमध्ये साध्या गृहिणी आहेत, मजूर आहेत, कॉलेजला जाणाऱ्या युवती आहेत, नोकरी करणाऱ्या महिला आहेत. बहुसंख्य बुरखाधारी असल्या, तरी बुरखा न घेणाऱ्याही आहेत. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या अन्यधर्मीय युवतीही भेटल्या.
मुंबईबाग आंदोलन सुरू झाल्यावर दोन-चार दिवसांत बायकांचा उत्साह संपेल, असं सरकार, प्रशासन, नेतेमंडळी आणि घरांतल्या पुरुषांनाही वाटलं होतं. पण तसं झालं नाही. बायका उठत नाहीत म्हटल्यावर पोलिसांनी तिथं बसलेल्या बायकांच्या हातात १४९च्या नोटिसा देऊन त्यांच्या सह्या घेतल्या. बेकायदा कृत्य करण्यासाठी एकत्र येणे, असं ते कलम आहे. फक्त बायकाच नव्हे, तर त्यांना पाणी देणारे, चहा-नाश्ता पुरवणारेही यातून सुटले नाहीत. तिथे केळी विकणारा एकजणही १४९च्या नोटिशीचा धनी झाला.
मुंबई महापालिकेलाही याच वेळी आपण हा रस्ता करत असल्याची आठवण झाली. अनेक दिवस बंद पडलेलं काम सुरू करण्यात आलं. कामात अडथळा आणतात म्हणून पालिका उपायुक्तांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. आंदोलन करणाऱ्या ३००हून अधिकजणींवर कलम ३४१खाली गुन्हा दाखल झाला. 'पालिका काम करायला मोकळी आहे. आम्ही दूर जाऊन बसू. एका बाजूचा रस्ता तयार झाल्याचं तुम्ही बघताय. दुसऱ्या बाजूचाही होऊ शकतो. रखडलेलं काम सुरू झालं, याचं स्वागतच आहे.' महिला सांगतात.
हवेत कमालीचा उष्मा आहे. पण आंदोलनस्थळावर मंडप घालायला परवानगी नाही. स्पीकर वापरायलाही परवानगी नाही. मंडपाची परवानगी नाकारली, म्हणून कुणीतरी फेरीवाल्यांकडे असतात तशा चार-पाच मोठ्या छत्र्या घेऊन आलं. पोलिसांनी त्याही उचलून नेल्या. उन्हाचे चटके बसत होते. बुरख्यांत तर आणखी त्रास होत असणार. पण तक्रार न करता बायका शांतपणे बसल्या होत्या.
मगाशी चौकशी करून गेलेल्या दोघी आता गप्पांमध्ये सामील झाल्यात. 'मी ३३ वर्षांची आहे. इथेच जन्मले, वाढले. एवढ्या वर्षांत आज वाटतं तेवढं भय कधीही वाटलं नव्हतं. राज्यघटनेचं बळ पाठिशी आहे तोवर कसलीच काळजी नाही, याची खात्री वाटायची. अन्य धर्मीयांमध्ये वावरताना एकमेकांवरचा विश्वास कधी कमी झाला नव्हता. पण हे लोक आता घटनेवरच घाला घालायला निघालेत. पुन्हा फोडा आणि झोडाचा खेळ देशात सुरू झालाय.'
दुसरी म्हणाली, 'आयुष्यात कधी कसल्या मोर्चात गेलो नाही, निदर्शनं केली नाहीत. 'सीएए', 'एनपीआर' आणि 'एनआरसी'ने आम्हाला रस्त्यावर यायला भाग पाडलं. आता मागे हटणार नाही.' दोघींना नावं विचारली तर म्हणाल्या, 'नावात काय आहे? लिखो, मुंबई बाग की भारतीय महिलाएं…'
सत्तरीच्या मेहरुझ काझी म्हणाल्या, 'उमर गयी बेटा. कभी लगा नहीं था, इस उमर में ऐसे रास्ते पर आकर लडना पडेगा. तबीयत खराब रहती है. कुणीतरी म्हणालं जन्माचे पुरावे शोधा. म्हणून माझा जन्म झाला त्या हॉस्पिटलमध्ये तीनदा गेले. तिथला माणूस म्हणतो, इतके जुने कागद कसे लगेच सापडणार? दरवेळी तो नवी कारणं सांगतो.'
रेहाना खान आणि शहाना खान या चळिशीच्या दोघी मुंबईबागेत दररोज हजेरी लावतात. घरातल्या पुरुषांचा त्यांना पाठिंबा आहे. मुलं आधी म्हणायची, 'अम्मी, ऐसे बैठने से कुछ नहीं होगा. अपना टाइम मत गंवाओ.' आता मुलांना कळून चुकलंय, अपनी अम्मी हारनेवाली हैं नहीं. रेहाना दहावीपर्यंत, तर शहाना अकरावीपर्यंत शिकल्या आहेत. त्या सांगतात. 'पहले लगता था, सियासत से हम औरतों का क्या लेना-देना? लेकिन अब समझ में आ रहा है कि जिंदगी बदलनी है, तो औरतों को यह समझना ही चाहिये. आमचं तर अर्धं आयुष्य सरलं. पण भीती वाटते मुलांसाठी. त्यांच्यासाठी आम्ही नक्की कसलं जगणं मागे ठेवून जातोय, असं वाटतं.' शहानाच्या डोळ्यांत पाणी तरळतं. रेहाना तिच्या खांद्यावर हात ठेवते. म्हणते, 'देखना मॅडम, वे कितने भी हमें तोडने की कोशिश करें, हम जोडेंगे…'
फिरोज मिठाबोरवाला हे या महिलांसोबत पहिल्यापासून आहेत. आंदोलकांशी चर्चा, कायदेशीर बाबी यात ते त्यांना मदत करताहेत. 'इथे कुणीच नेता नाही. सगळे सारखे. राजकीय अडचण होऊ लागल्यावर आंदोलन मागे घ्या, असा दबावही आला. पण महिलांनी दाद दिली नाही. आंदोलन कधीपर्यंत चालवायचं, हेही महिलाच ठरवतील. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. त्यात राज्य सरकारने सीएए, एनपीआर, एनआरसी याबद्दलची भूमिका स्पष्ट करावी. खिलाफत हाऊसला समविचारी संघटनांची बैठक आहे. त्यात मुंबईबागचे प्रतिनिधीही असतील. त्यात एकूणच राज्यातील आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार आहे,' ते सांगतात.
'मुंबईबाग'मध्ये दरम्यानच्या काळात थोडा तणाव होता. डॉ. रेश्मा शेख त्याबद्दल म्हणाल्या, 'या महिलांचं प्रतिनिधित्व करणारी एक समिती तयार करायची होती. ती तयार झाली तेव्हा रोज धरणं देणाऱ्यांपैकी त्यात कुणीच नाही, अशी तक्रार महिलांनी केली. आता ही समिती आम्ही पुन्हा तयार करतोय.' डॉ. रेश्मा वैद्यकीय प्रॅक्टिस बाजूला ठेवून दररोज इथं हजेरी लावतात. आजच्या घडीची ती गरज आहे असं त्यांना वाटतं. त्यावेळी मरियम ही कार्यकर्ती महिलांना समितीत येण्याबद्दल आवाहन करत होती. नावं लिहून घेत होती. बायका स्वतःहून हात वर करत होत्या. नवं नेतृत्व घडत होतं…
संध्याकाळ झाली होती. कामावरून सुटलेल्या बायका, शाळा-कॉलेजातून परतलेल्या मुली घरी जाण्याआधी थेट मुंबईबागेत पोहोचत होत्या. कुणाच्या बोटाशी शाळकरी मुलं लटकत होती. गर्दी वाढू लागली होती. घोषणांचे आवाज मोठे होऊ लागले होते.