म. टा. विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणे हा महाराष्ट्राचा घोर अपमान असून हा नतद्रष्टांचा खेळखंडोबा आहे, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली. राज्यात सुरू असलेल्या सत्तापेचावर राज यांनी पहिल्यांदाच भाष्य करताना शिवसेना-भाजपवर टीका केली आहे.
निवडणूक निकालानंतरही सत्तापेच न सुटल्याने राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केंद्राला शिफारस केली. केंद्राच्या शिफारसीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या अध्यादेशावर सही केली. त्यावर भाष्य करताना राज ठाकरे यांनी सत्तेचे दावेदार असलेल्या सर्व पक्षांना आपल्या टीकेचे लक्ष्य बनविले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे हा महाराष्ट्राचा घोर अपमान आहे. हा नतद्रष्टांचा खेळखंडोबा आहे. या नतद्रष्टांमुळेच महाराष्ट्राला या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. या नतद्रष्टांनी महाराष्ट्राचा घोर अपमान केला, अशी टीका राज यांनी केली आहे.