म. टा वृत्तसेवा, घोटी
अतिपावसामुळे गेल्या आठवड्यापासून नुकसानग्रस्त झालेल्या १२६ गावांतील ९३९० शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरस्थिती आणि अतिपावसामुळे इगतपुरी तालुक्यातील १० हजार ३४९ हेक्टर क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांनी आपल्या अधिकाऱ्यांसह गावोगावी भेटी देणे सुरू केले आहे. नुकसानीचा सर्वांगीण अहवाल शासनाला पाठवून शक्य तेवढ्या लवकर आपद्ग्रस्तांना दिलासा देण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू असल्याचे तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर, मंडळ कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी सांगितले.
खासदारांनी घेतला आढावा
इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पंधरा दिवस भात शेती महापुरात होती. त्यामुळे भातशेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. याबाबत झालेल्या नुकसानीबाबत खासदार हेमंत गोडसे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांकड़ून आढावा घेतला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, उपसभापती भगवान आडोळे, नंदलाल भागडे यांच्यासह समाधान जाधव, विक्रम मुणोत, हरीश चव्हाण आदींसमवेत चर्चा केली.
प्रत्यक्षण पाहणी दौरा उद्या
सटाणा : अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेती व इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईचे प्रस्ताव सरकारला सादर करावेत, अशी सूचना आमदार दीपिका चव्हाण यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना केली. याबाबत उद्या (दि. १२) प्रत्यक्ष पाहणी दौऱ्याचे आयोजनही करण्यात आले असून, सर्व नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचेही आयोजन करण्यात येणार आहे. गेल्या दोन आठवड्यापासून बागलाण तालुक्यात अतिवृष्टीने जनजीवन ठप्प झाले आहे. तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले असेल स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार किंवा आमदार कार्यालयाकडे लेखी अर्ज सादर करून झालेल्या नुकसानीची माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.