म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांच्या महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवसांचा अवधी लागेल, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी शनिवारी दिले. 'आम्ही सरकार स्थापनेबाबत कोणतीही डेडलाइन निश्चित केलेली नाही. सध्या दोन्ही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची चर्चा सुरू असून, दोन्ही पक्षांना सेनेसोबत जाण्यात काहीच अडचण नाही', असेही ते म्हणाले.
'राज्यात नवीन सरकार स्थापन करताना तिन्ही पक्षांना कोणते मुद्दे मान्य होतील, याची चाचपणी आम्ही केली आहे. त्याचा अहवाल तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांना देण्यात आला आहे. नव्या आघाडीत प्रथम मंत्र्यांची संख्या निश्चित होईल. यानंतरच खातेवाटपाची प्रक्रिया पार पडेल. घाईघाईत सत्ता स्थापन केल्यास पुढे काही मुद्दे उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे सर्व मुद्द्यांवर स्पष्टता येऊन सहमती झाल्यानंतर तिन्ही पक्ष लवकरात लवकर सरकार स्थापन करतील. नव्या आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकवायचे असल्याने सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीला शिवसेनेसोबत जाण्यात काहीच अडचण नाही. राज्याचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. भाजपच्या राजवटीतील अर्धवट विकासकामे आम्ही वेगाने पूर्ण करू', असे पाटील म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस हे दररोज स्वप्न पाहत आहेत. म्हणूनच रोज सकाळी उठून ते मीच मुख्यमंत्री होईल असे सांगत आहेत. ते आता मुख्यमंत्री नाहीत पण त्या मानसिकतेतून ते बाहेर पडायला तयार नाहीत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शनिवारी केली आहे. राज्यात भाजपचे सरकार येईल आणि पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री होतील, असा दावा भाजप नेते करीत आहेत. याकडे लक्ष वेधले असता मलिक म्हणाले की, 'सत्तेसाठी भाजपमध्ये दाखल झालेल्यांना राजकीय वास्तव समजण्यास सुरुवात झाली आहे. भाजपची सत्ता येणार नसल्याचे लक्षात आल्यामुळे निवडणुकीपूर्वीच्या आयारामांना रोखण्यासाठी भाजपतर्फे पोकळ दावे केले जात आहेत.'
...
'कर्नाटकची पुनरावृत्ती नाही'
कर्नाटकची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ शकत नाही. तसेच दिल्लीत मंगळवारी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट होणार असून त्यानंतर पुढील निर्णय होणार आहेत, असे मलिक यांनी नमूद केले.