अ‍ॅपशहर

तणावमुक्तीसाठी जगण्याचे आनंददायी पर्याय निवडा

'समाजामध्ये, कुटुंबामध्ये माणसांनी ठरवून दिलेली ब्लॅकशिप्स असतात, त्यांच्यावर आपल्या दुःखाच्या जबाबदारीचे बिल फाडले की निवांत राहता येते. मात्र त्यामुळे ताणतणावातून सुटका मिळत नाही, कुणी कसे जगायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असला, तरीही जगण्याच्या आनंददायी पर्यायांची निवड मात्र आपली असते,'

Maharashtra Times 15 Feb 2018, 3:40 am
मटा मीडिया पार्टनर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम happy


मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर यांचा सल्ला

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

'समाजामध्ये, कुटुंबामध्ये माणसांनी ठरवून दिलेली ब्लॅकशिप्स असतात, त्यांच्यावर आपल्या दुःखाच्या जबाबदारीचे बिल फाडले की निवांत राहता येते. मात्र त्यामुळे ताणतणावातून सुटका मिळत नाही, कुणी कसे जगायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असला, तरीही जगण्याच्या आनंददायी पर्यायांची निवड मात्र आपली असते,' असा मानसिक आरोग्याच्या दृष्टीने मोलाचा सल्ला प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर यांनी 'डॉक्टरांशी संवाद' या व्याख्यानमालेत दिला.

'रोटरी क्लब ऑफ पार्लेश्वर' यांनी विलेपार्ले पूर्व येथील हनुमान रोडवरील डॉ. हेडगेवार मैदानावर 'संवाद डॉक्टरांशी' या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर असलेल्या या व्याख्यानमालेचा प्रारंभ सोमवारी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर यांच्या 'सांगा कसं जगायचं' या पहिल्या सत्राने झाला. मानसिक आरोग्य सक्षम ठेवण्यासह ताणतणावांचा सामना करत आनंदी आयुष्याचा पर्याय कसा निवडायचा, याविषयी डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.

उपस्थितांच्या प्रश्नांच्या उत्तरांचा परामर्श घेत आत्मानंदाचे अनेक पर्याय डॉक्टरांनी हळुवारपणे खुले केले. काम आणि कुटुंब यांचा समतोल, लैंगिकता, लहान मुलांचे वागणे, जुन्या-नव्या पिढीचा संघर्ष, आप्तांच्या मृत्यूमुळे येणारे वैफल्य अशा विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. 'ताण नकोच हा दृष्टिकोन चुकीचा आहे. आयुष्यात थोडासा ताण नक्कीच असायला हवा. हा ताण कामाला उद्युक्त करतो, विचार, कृती करायला प्रवृत्त करतो. त्यामुळे या ताणतणावांचे नियोजन कसे करायचे, हे मात्र समजून घेतले पाहिजे. जी परिस्थिती आपण बदलू शकत नाही, त्याचा स्वीकार करावा, परिस्थितीऐवजी मनस्थितीमध्ये बदल करावा,' असा मूलमंत्रही डॉ. भाटवडेकर यांनी दिला.

मुलांच्या बदलत्या सवयी, इंटरनेटचे आक्रमण यामुळे चिंताग्रस्त झालेल्या अनेक पालकांनी डॉक्टरांना प्रश्न विचारले. संघर्षमय परिस्थितीचा परिणाम वाढत्या वयात मुलांवर होत असतो, अशावेळी मुलांना झिडकारण्यापेक्षा त्यांना स्वीकारायला हवे, असे डॉ. भाटवडेकर यांनी आवर्जून सांगितले. सकारात्मक विचार करा, त्यामुळे इच्छित गोष्टी घडून येतात, असा प्रचार केला जातो. पण सकारात्मक विचारांना सकारात्मक कृतीशीलताही गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले. इंटरनेटचे वाढते व्यसन केवळ तरुणांनाच नाही तर प्रत्येकामध्ये कमीअधिक प्रमाणामध्ये आहे. यामुळे अनेक देशात उभे राहिलेले वैयक्तिक- सामाजिक पेच डॉक्टरांनी यावेळी उलगडून सांगितले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ पार्लेश्वरचे अध्यक्ष नितीन विचारे यांच्याहस्ते डॉक्टरांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ब्लू क्रॉस लॅबचे भालचंद्र बर्वेही उपस्थित होते.

भावनांचा निचरा होणे महत्त्वाचे

आनंद, राग, दुःख, उद्वेग या भावनांचा स्वीकार करून त्यांचा निचरा करायला शिकले पाहिजे, या भावना दडपून ठेवल्या तर त्याचा उद्रेक कधीतरी होतोच, त्याशिवाय शरीरामध्ये अनेक आजारही जन्म घेतात, असा सल्ला त्यांनी दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज