म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन परिसर कायमच गजबजलेला असतो. या गजबजलेल्या परिसरामध्ये माकडांचाही वावर मोठ्या प्रमाणात असतो. मात्र लॉकडाउन जाहीर झाल्यापासून या पर्यटन क्षेत्रातील माकडे पुन्हा जंगलाच्या दिशेने वळली आहेत. पर्यटन परिसरातील माकडांचा वावर कमी झाला असून ही सकारात्मक गोष्ट या निमित्ताने समोर आली आहे.
पर्यटन क्षेत्रामध्ये कायम पर्यटकांचा वावर असतो. या परिसरात येणारे पर्यटक माकडांना सोबत आणलेला खाऊ खायला घालतात. या परिसरामध्ये असलेल्या स्टॉलवरूनही कैरी, चिंचांपासून सगळी फळे विकत घेऊन ही मीठ, तिखट लावलेली फळे त्यांना खायला घातली जातात. त्यामुळे या आयत्या खाण्याची त्यांना सवय झाली होती. आता राष्ट्रीय उद्यानात पर्यटक अजिबात फिरकत नसल्याने या माकडांनी पुन्हा एकदा नैसर्गिक पद्धतीने अन्न मिळवण्यासाठी जंगलामध्ये जाण्याला पसंती दिली आहे, अशी माहिती कृष्णगिरी उपवनचे वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश देवरे यांनी दिली. हे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. या परिसरात प्रामुख्याने लंगूर, बोनेट, मकॅक आढळत होते. हे आता फारच तुरळक प्रमाणात आढळत आहेत.
लॉकडाउनच्या निमित्ताने जंगलात होणाऱ्या बदलांसंदर्भात सध्या निरीक्षणे नोंदवली जात आहेत. यातील हे एक महत्त्वाचे निरीक्षण आहे. भूतदयेचा भाग म्हणून पर्यटक या भागातील माकडांना खायला घालतात. या पर्यटकांना दंड केला तरी प्राण्यांना खायला घालायचा प्रकार कमी होत नाही. प्राण्यांच्या आरोग्यासाठी वेफर्स, चीप्स, बिस्किट्स, गोळ्या तसेच मीठ-मिरची, तिखट, हळद लावलेले पदार्थ हानीकारक असतात. या पदार्थांची चटक लागून ते खाण्यासाठी माकडे पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात येतात. प्राण्यांना असे अन्न खायला घालणे हे कायदेशीरदृष्ट्याही चुकीचे आहे. पूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात कचराकुंड्यांजवळ हरणेही चरताना आढळायची. मात्र या कचराकुंड्या बंदिस्त करून घेतल्यानंतर याचे प्रमाण कमी झाल्याचे देवरे यांनी स्पष्ट केले. या परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येणारे नागरिक रस्त्यावर पडलेल्या फुलांच्या सड्यालासुद्धा नावे ठेवून हा कचरा साफ न केल्याच्या तक्रारी करायचे. हा सडाही आता रस्त्यावर दीर्घ काळ नैसर्गिक स्थितीत राहतो.
अधिक जिवंत आणि नैसर्गिक
पर्यटकांची संख्या कमी झाल्याने स्वाभाविकपणे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील कचऱ्यातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान माणसांच्या भरमसाठ वावराशिवाय आणि निसर्गाच्या सान्निध्यात बेजबाबदार वर्तनाशिवाय अधिक जिवंत आणि नैसर्गिक वाटत असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.