अ‍ॅपशहर

इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम सुरु

भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबे़डकर यांच्या इंदू मिलमधील आंरराष्ट्रीय स्मारकाचे काम सुरु करण्यात आले आहे. हे स्मारक लवकरच पुर्ण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Maharashtra Times 6 Dec 2016, 3:48 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tribute to ambedkar
इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम सुरु


भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबे़डकर यांच्या इंदू मिलमधील आंरराष्ट्रीय स्मारकाचे काम सुरु करण्यात आले आहे. हे स्मारक लवकरच पुर्ण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले होते.त्यावेळी प्रसारमाध्यांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक लवकरात लवकर होणे ही सर्वांचीच इच्छा आहे. त्यादृष्टीने काम सुरु आहे. या स्मारकामुळे भावी पिढ्यांनी प्रेरणा मिळेल असे ते म्हणाले. देशातील सर्वसमस्यांचे उत्तर भारतीय संविधानात असल्याचे सांगतानाच बाबासाहेब तर त्यांनी नोटाबंदीला पाठींबा दिला असता असा दावाही फडणवीस यांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत शिक्षण मंत्री विनोद तावडे, महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि महापौर स्नेहल आंबेकर आदी उपस्थित होते.

निळ्या जनसागराला उधाण

बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने भीमसैनिक चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. सोमवारपासूनच राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भीमसैनिक कुटुंबकबिल्यासह चैत्यभूमीवर आले आहेत. हातातील निळा आणि धम्म ध्वज ऊंचावत 'जय भीम, जय बूद्ध', आणि 'जयभीम बोलो,चैत्यभूमी चलो,' अशा घोषणा देतच भीमसैनिक चैत्यभूमीकडे येत होते. पुरुष पांढरा ड्रेस आणि निळ्या टोप्या परिधान करुन आले होते. तर स्त्रीया पांढऱ्या साड्या नेसुन आल्या होत्या. त्यामुळे संपुर्ण दादर परिसर बुद्ध-भीममय झाला होता. चैत्यभूमीवर येणाऱ्या भीमसैनिकांच्या सोयीसाठी महापालिका आणि बेस्टने मोठ्याप्रमाणावर सुविधा ठेवल्या होत्या. भारत विकास ग्रुप,हिंदुस्थान पेट्रोलियम, विविध बँक कर्मचारी संघटना, रिपब्लिकन पक्षांचे विविध गट आणि संस्था-संघटनांनी मुंबईबाहेरुन येणाऱ्यांसाठी शिवाजी पार्कवर भोजन,चहा-पाण्याची व्यवस्था केली होती.

कविसंमेलनातून अभिवादन

शिवाजी पार्कात पथनाट्य आणि गायनपार्ट्यांमधून बाबासाहेबांना अभिवादन केले जात होते. तर वरळीत उठाव साहित्य मंच या कविंच्या संघटनेने बाबासाहेबांना काव्यमय अभिवादन केले. कवी विवेक मोरे, गजलकार गजानन गावंदे,महादू पवार आणि आर्यरत्न कांबळे आदी कविंनी या कविसंमेलनात भाग घेतला होता. वडाळ्याच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणातही 'भीमांजली' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया, प्रसिद्ध पखवाज वादक भवानी शंकर ,उस्ताद दिलशाह खान, पंडित मुकेश जाधव, आणि पंडित विश्वमोहन भट यांनी सूर-तालाची मैफल जमवत महामानवाला आगळेवेगळे अभिवादन केले.

पुस्तकांची विक्रमी विक्री

सालाबाद प्रमाणे यंदाही चैत्यभूमीवर पुस्तकांची विक्रमी विक्री झाली. विशेष म्हणजे नोटाबंदीचा फटका बसलेला असतानाही पुस्तक खरेदीला झुंबड उडालेली होती. त्याशिवाय चैत्यभूमीवर राबविल्या जात असलेल्या ,एक वही,एक पेन' या मोहिमेलाही प्रचंड प्रतिसाद मिळाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज