अ‍ॅपशहर

मालाड, अंबरनाथमध्ये तिहेरी हत्या!

मालाडचा मालवणी परिसर आणि अंबरनाथ तालुक्यातील करवले गाव गुरुवारी तिहेरी हत्याकांडाने हादरून गेले. मालवणीमध्ये ५० वर्षीय आजीसह तिच्या दोन नातवंडांची हत्या करण्यात आली; तर करवले गावात आई-वडील आणि त्यांच्या तरुण मुलाची हत्या केल्याचे उघडकीस आले.

Maharashtra Times 24 Jun 2016, 1:32 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई/म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम triple murder at malad and ambernath
मालाड, अंबरनाथमध्ये तिहेरी हत्या!


मालाडचा मालवणी परिसर आणि अंबरनाथ तालुक्यातील करवले गाव गुरुवारी तिहेरी हत्याकांडाने हादरून गेले. मालवणीमध्ये ५० वर्षीय आजीसह तिच्या दोन नातवंडांची हत्या करण्यात आली; तर करवले गावात आई-वडील आणि त्यांच्या तरुण मुलाची हत्या केल्याचे उघडकीस आले.

मालवणीतील न्यू कलेक्टर कॉलनीतील गेट क्रमांक ६, प्लॉट नंबर २३ येथे बबली शॉ या मुलगी तुलसी ऊर्फ शबाना हिची मुले आर्यन (१३) आणि सानिया (१०) या नातवंडांसह राहत होत्या. गुरुवारी या तिघांचीही घरातील चाकूने हत्या करण्यात आली.या प्रकरणी पोलिसांनी बबलीचा जावई इस्माईल शेख याला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. बबलीची मुलगी शबाना हिच्या नावे असलेल्या दुकानाच्या हिश्श्यावरुन बबली व जावई इस्माईल यांच्यात अनेकदा वाद होत असत.

गुरुवारी सकाळी ५० वर्षीय बबली शॉ ही पाणी भरण्यासाठी बाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी तिचे दार ठोठावले. यावेळी घराचा आतील दरवाजा उघडा दिसला. शेजाऱ्यांनी आत डोकावले असता बबली आण‌ि तिची दोन्ही नातवंडे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. यानंतर बबलीचा भाचा संजू व पोलिसांना पाचरण केले. तीन हत्यांमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून या वर्षभरातील हे पाचवे हत्यासत्र ठरले आहे.

करवले गावातील शंकर भंडारी (६०), त्यांची पत्नी पसुबाई भंडारी (४८) आणि मुलगा सन्नी भंडारी (२२) या तिघांची गुरुवारी पहाटे कु‍ऱ्हाडीचे घाव घालून हत्या करण्यात आली. भंडारी यांच्या घरातून सोने, चांदीचे दागिने असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. त्यामुळे या हत्या दरोडेखोरांनी केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शंकर भंडारी यांचा एक मुलगा पत्नीसह तिच्या माहेरी गेल्याने बचावल्याचे उघड झाले आहे. भंडारी यांचा मधला मुलगा सचिन हा गुरुवारी पहाटे सासुरवाडीहून घरी आला असता आई-वडील रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्याला दिसले. या तिघांचे मृतदेह उल्हासनगर येथील सेन्ट्रल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

चोरीच्या उद्देशानेच या हत्या झाल्याचा आमचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या हत्येमागे अन्य काही कारण आहे का यासाठी पथक नेमण्यात आल असून लवकरच या घटनेच्या मूळापर्यंत आम्ही पोहोचू, असा विश्वास परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सुनील भारद्वाज यांनी व्यक्त केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज