अ‍ॅपशहर

‘उडान’चे पंख महाराष्ट्रात दुबळे

महाराष्ट्रात हवाई प्रादेशिक कनेक्टिव्हिटीच्या उडान योजनेचे पंख सध्या तरी दुबळेच ठरल्याची चिन्हे आहेत.

Maharashtra Times 24 Oct 2016, 4:20 am
sameer.karve@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम udaan weak in maharashtra
‘उडान’चे पंख महाराष्ट्रात दुबळे


Tweet : @sameerkarveMT

मुंबई : जवळची प्रादेशिक केंद्रे हवाईमार्गे जोडण्यासाठी विमान कंपन्यांना आर्थिक बळ देण्याची उडान योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे. मात्र, जुहू विमानतळाच्या विस्ताराला असलेल्या मर्यादा आणि मुंबई विमानतळावर सकाळ व संध्याकाळच्या मोक्याच्या वेळी धावपट्टीचे स्लॉट्स मिळण्याची कोंडी यामुळे महाराष्ट्रात हवाई प्रादेशिक कनेक्टिव्हिटीच्या उडान योजनेचे पंख सध्या तरी दुबळेच ठरल्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्रात प्रादेशिक स्तरावर विमानसेवेला प्रोत्साहन द्यायचे ठरवल्यास या भागांतून कामासाठी मुंबईत येणारे उद्योजक, अधिकारी, प्रवाशांना ती सेवा सोयीची ठरायला हवी. त्यामुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटीचा विचार करता कोणत्याही शहराला मुंबईशी जोडण्यावाचून व्यवहार्य पर्याय उरत नाही. उडान योजनेत जुहू विमानतळाचा वापर करायचा ठरविल्यास ३० आसनी विमानांनी मुंबई ते कराड (सातारा) किंवा अॅम्बी व्हॅली, हडपसर यासारखी काही ठिकाणे जोडता येतील. छोटी विमाने किंवा हेलिकॉप्टरने महाराष्ट्रातील प्रादेशिक विमानप्रवास १,७०० ते २,५०० रुपयांत शक्य होईल, अशा शक्यता सध्या काहीजण वर्तवीत आहेत. मात्र विमानवाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी हे दावे फोलच ठरवले आहेत.

जुहू विस्ताराच्या मर्यादा

जुहू विमानतळाच्या धावपट्टीचा सध्या पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. तेथे सहा आसनी विमाने उतरू शकतात, मात्र आधीच आखूड असणाऱ्या या धावपट्टीला अतिक्रमणांचाही विळखा असल्याने तीन-चार प्रवासी असतील तरच वैमानिक इथे लँडिंग करण्याची जोखीम घेतात. या धावपट्टीचा पश्चिमेकडे समुद्रात विस्तार करण्याच्या योजनेची वारंवार चर्चा होते. मात्र हे काम व्यवहारात येण्यास किमान पाच ते १० वर्षे तरी जातील. मुंबई व जुहू विमानतळांच्या ऑपरेशन्सचा समन्वय हे आव्हान राहीलच.

स्लॉट‍्सवर कोंडी

महाराष्ट्रात प्रादेशिक कनेक्टिव्हिटी तयार करायची, तर अंतर्गत भागातून मुंबईत कार्यालयीन वेळेच्या अगोदर विमान पोहोचायला हवे. परंतु सकाळी सात ते दहापर्यंतच्या वेळा सध्या दिल्ली व महत्त्वाच्या मेट्रोंमधून येणाऱ्या विमानसेवांनी व्यापलेल्या आहेत. संध्याकाळीही असाच प्रकार असतो. त्यामुळे नांदेडहून येणाऱ्या विमानाला सकाळी १०, ११ वाजेपर्यंत मुंबईत शिरकावच मिळणार नसेल आणि नांदेडची व्यक्ती विमानाने निघूनही दुपारी दोननंतर मुंबईत पोहोचणार असेल तर त्याला विमानसेवेचा काहीच लाभ मिळणार नाही.

कोठे प्रतिसाद?

मुंबई ते नांदेड, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, भावनगर, दीव, रत्नागिरी तसेच औरंगाबाद ते नागपूर, ओझर ते नागपूर, ओझर ते कोल्हापूर, ओझर ते अहमदाबाद, ओझर ते सुरत, जळगाव ते भोपाळ या प्रादेशिक सेवांना उडान योजनेअंतर्गत प्रतिसाद मिळू शकतो. नांदेड, जळगाव येथे रात्रीची लँडिंग सुविधा तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्याने मुंबईतील काम आटोपून व्यक्ती सायंकाळच्या विमानाने तेथे परतू शकते. ओझर-अहमदाबाद, जळगाव-भोपाळ या सेवांसाठी दोन राज्यांनी प्रयत्न करायला हवेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज