अ‍ॅपशहर

'शेतकऱ्यास फासावर लटकवणार आहे काय?'

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. मग शेतकऱ्यांच्या प्रेतांचा खच रोखणे हे त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट का असू नये?, असा खरमरीत सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Maharashtra Times 19 May 2017, 9:00 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhav attacks on fadnavis government on farmer issue
'शेतकऱ्यास फासावर लटकवणार आहे काय?'


शेतीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीचा आक्रोश सुरू आहे, मात्र सरकार म्हणते शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे प्रेतांचे ढिगारे पडले तरी बेहत्तर पण कर्जमाफी मिळणार नाही. या प्रेतांच्या ढिगाऱ्यावर बसून मोदी फेस्टिव्हल साजरा करणाऱया सरकारच्या विरोधात शेतकरी गर्जना करणार असेल तर फडणवीसांचे सरकार त्या गरीब शेतकऱ्यास देशद्रोही ठरवून फासावर लटकवणार आहे काय?, असा संताप व्यक्त करतानाच नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. मग शेतकऱ्यांच्या प्रेतांचा खच रोखणे हे त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट का असू नये?, असा खरमरीत सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

कर्जमुक्ती मिळावी म्हणून नाशिक जिल्ह्यातील १४० गावांतील शेतकरी संपावर जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'मधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर शरसंधान साधले. गर्जेल तो पडेल काय? असे नेहमीच विचारले जाते, पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची गर्जना आता पडणार नाही. नाशिक परिसरातील १४० गावांतील शेतकरी संपावर चालले आहेत. हा निर्णय त्यांनी एका वैफल्यातून घेतला आहे. त्यांना स्वतःसाठीही पिकवायचे नाही आणि बाजारात विकण्यासाठीही पिकवायचे नाही. शेती हीच आमची काळी आई. आई संपावर जात असेल तर ही सरकारची नामुष्की आहे, अशी टीका उद्धव यांनी केली.

मलिदाछाप धोरण

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाचे मोर्चे निघाले तेव्हा त्यांच्या संघटनांत फूट पाडण्यात आली. सदाभाऊ खोत व राजू शेट्टी यांच्यात उभी फूट पाडून त्यांनी जो क्लेश निर्माण केला. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतही फूट पडली आहे. फोडा, झोडा आणि सत्ता टिकवा या मलिदाछाप धोरणाने सुरू असलेले राज्य शेतकऱ्याला जगू देत नाही व अन्यायाविरुद्ध लढू देत नाही, असा आरोपही त्यांनी केला.

उद्धव यांचा आसूड

> शेतीपेक्षा सरकारला बिल्डरांचे व धनिकांचे हित प्यारे बनले आहे. शेतकऱ्याला नक्की काय हवे आहे याचा विचार सरकार म्हणून खुर्च्या उबवणाऱ्यांनी कधी केला आहे काय?

> शेतकऱयांच्या या सरळसोट मागण्या आहेतच. शेती करण्याची व पिकवण्याची त्याची क्षमता आज संपली आहे. शेतकरी हा भाकड गुरांपेक्षाही लाचार आणि असहाय्य बनला आहे. समृद्धी महामार्गाचा पांढरा हत्ती पोसण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या विझलेल्या चुली पेटणे महत्त्वाचे आहे.

> गरजणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलीस बंदूक रोखीत आहेत. दंडुके चालवीत आहेत. तूरडाळीस भाव मागणाऱ्यांना शिव्यांची लाखोली मिळत आहे. मरणाऱ्या शेतकऱ्यांचे विडंबन चालले आहे. शेतकऱ्यास गुलाम करून मारण्याचे हे कारस्थान आहे. ते उधळून लावण्यासाठी नाशकात आज शेतकऱ्यांची गर्जना होत आहे. ही गर्जना सिंहासनास हादरा दिल्याशिवाय राहणार नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज