म. टा. प्रतिनिधी, मुंबई
अयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या प्रश्नासाठी स्पष्ट भूमिका घेणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या दोन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावरून रविवारी मुंबईत परतले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवसैनिकांनी त्यांचे ढोलताशाच्या गजरात जंगी स्वागत केले. तर, या दौऱ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी टीका केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विमानतळावरील स्वागतासाठी शिवसेनेचे खा. विनायक राऊत, परिवहन मंत्री दिवाकर रावते, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक हजर होते. सायंकाळी चारच्या सुमारास उद्धव ठाकरे यांचे विशेष विमान मुंबईच्या धावपट्टीवर उतरले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी, मुलगा आदित्य यांच्यासह ते विमानतळाबाहेर आले. तेव्हा उपस्थित शिवसैनिकांच्या घोषणांनी विमानतळाचा सारा परिसर दणाणून सोडण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा विमानतळावरून मातोश्री बंगल्यावर पोहोचला. तेथे उद्धव ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन केले. उद्धव यांचा अयोद्धा दौरा निर्विघ्नपणे पार पडला. हा दौरा राजकीय वर्तुळात गाजला. राम मंदिराच्या प्रश्नावर सत्ताधारी भाजपला पेचात पकडण्यासाठी शिवसेना यशस्वीही ठरली. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई-ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाल्याचे शिवसेनेत बोलले जात आहे.
'मतदारांच्या भीतीने अयोध्या यात्रा'
शिवसेना आणि भाजप गेली काही वर्षे परस्परांवर चिखलफेक करत आहेत. मात्र आगामी निवडणुकांत सेना-भाजप दोघांनाही युती करायची आहे. अशा वेळी कोणत्या तोंडाने मतदारांना सामोरे जायचे या भीतीने ग्रासल्यामुळेच उद्धव ठाकरे यांना अयोध्या यात्रा करावी लागली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. श्रीरामाचा मुद्दा पुढे करत दोघांनाही पुन्हा युती करायची आहे. त्यासाठी अयोध्या यात्रा होती, अशी टीका पवार यांनी रविवारी मुंबईत केली.
'सत्ता कधी सोडणार ते सांगा'
भाजपचा विरोध करण्यासाठी, भाजपवर सूड उगवण्यासाठी, भाजपची निंदा करण्यासाठी आणि फक्त भाजपला कोंडीत पकडण्यासाठीच शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला आहे. शिवसेना भाजपला विचारते की राम मंदिर कधी होणार त्याची तारीख सांगा, पण शिवसेनेने आधी ते सत्तेतून कधी बाहेर पडणार त्याची तारीख सांगावी, अशी टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. शिवसेनेकडे गेली २२ वर्षे मुंबई महानगरपालिकेची सत्ता आहे. तरीही मुंबईकरांना मुबलक व शुद्ध पाणी मिळत नाही, चांगले रस्ते नाहीत, कचरा व्यवस्थापन ढासळले आहे. मुंबईकरांना मूलभूत सोयी सुविधा मिळत नाहीत. मुंबईकरांचे गंभीर प्रश्न सोडविण्याऐवजी फक्त निवडणुकीसाठी शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा बाहेर काढल्याचा आरोप निरुपम यांनी केला.