हे करणे आवश्यक...
-बंद केलेले रस्ते आणि पुलांची माहिती देणारे फलक जागोजागी लावावेत.
-वळवण्यात आलेल्या वाहतुकीविषयी माहिती मिळावी यासाठी मोबाइल ॲप तयार करावे.
-ज्या बाजारपेठांच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते तेथे ठराविक अंतरावर वाहनतळाची व्यवस्था करावी.
-अशा बाजारपेठांत जाण्यासाठी पर्यायी वाहतुकीची सुविधा निर्माण करावी.
-आवश्यकता भासल्यास बेस्ट बसच्या प्रवासात सवलत देण्याचा विचार करावा.
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
पुलांचे बांधकाम जास्तीत जास्त वर्षे टिकण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी संबंधित यंत्रणांना केल्या. मुंबईतील पूल आणि रस्ते दुरुस्तीच्या कामाबाबत 'वर्षा' निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या सूचना केल्या.
घाटकोपर आणि जुहू तारा रोड येथील दोन पुलांची 'आयआयटी' आणि 'व्हीजेटीआय'मार्फत पुनर्तपासणी करण्यात आली असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यानंतर हे दोन्ही पूल वाहतुकीस खुले केले जातील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मुंबईत एकूण ३४४ पूल असून, त्यातील ३१४ पूल महापालिकेच्या, तर ३० पूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ताब्यात आहेत. त्यातील २९ पूल स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर बंद करण्यात आले आहेत. ९२ पूल सुस्थितीत असून, ११६ पुलांची किरकोळ, तर ६७ पुलांची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात येत आहे. मध्य रेल्वेमार्फत १९९ पुलांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षांत मध्य रेल्वेमार्फत ६८, तर पश्चिम रेल्वेमार्फत ३२ पादचारी पूल नव्याने बांधण्यात आले आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
भाजप खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशीष शेलार, आ. राज पुरोहीत, आ. अमित साटम, मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजयकुमार जैन आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल गुहा आदी अधिकारी बैठकीस उपस्थित होते.