अ‍ॅपशहर

नवीन उपचार पद्धतीने पांढऱ्या डागांवर मात

पांढरे डाग असलेल्या वधू-वरांचा मेळावा नुकताच मुंबईत झाला. या मेळाव्यात राज्याच्या विविध विभागातील पांढरे डाग असलेली वधू-वर मंडळी उपस्थित होती.

Maharashtra Times 17 Nov 2017, 3:00 am
पांढरे डाग असलेल्या वधू-वरांचा मेळाव्यात डॉ. तोरसेकर यांची माहिती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vadhu var melava
नवीन उपचार पद्धतीने पांढऱ्या डागांवर मात


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

पांढरे डाग असलेल्या वधू-वरांचा मेळावा नुकताच मुंबईत झाला. या मेळाव्यात राज्याच्या विविध विभागातील पांढरे डाग असलेली वधू-वर मंडळी उपस्थित होती. या मेळाव्यात प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. रघुनंदन तोरसेकर यांनी या आजारावर नवीन उपचार पद्धती उपलब्ध असल्याचे सांगून उपस्थितांच्या मनात आशेचा किरण निर्माण केला.

श्वेता असोसिएशन या पांढरे डाग असणाऱ्या व्यक्तींच्या स्वमदत गटाचा ३३ वा वधू-वर मेळावा नुकताच दादर येथील कित्ते भंडारी हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. तोरसेकर पती-पत्नी उपस्थित होत्या. अध्यक्षीय भाषणात डॉ. निरगुडकर यांनी समाजामध्ये अनेक गोष्टींबद्दल विचित्र भावना असते. पांढरे डाग असलेल्या मुलामुलींमध्येही ती असण्याचे कारण नाही असे स्पष्ट करत हा या मुला-मुलींचा नाही तर बघणाऱ्यांचा दृष्टी दोष असल्याचे सांगितले.

डॉ. निरगुडकर यांनी स्वतःच्या स्त्रीरोग तज्ज्ञ बहिणीचे उदाहरण देऊन सांगितले की, सोलापूरमध्ये स्वतःच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त बहिणीने वैद्यकीय पेशा बंद करून एचआयव्हीपीडित वेश्यांसाठी काम सुरू केले. हे काम अतिशय अवघड आहे. शरीरातील रोग दुरुस्त करता येईल पण मन दुरुस्त करणे कठीण आहे. सुप्रसिद्ध टेनिसपटू आर्थर रश याने वीस वेळा ग्रँडस्लॅम जिंकले. त्याला काही कारणांसाठी रक्त द्यावे लागले आणि त्याला एड्स झाला. मी वीस वेळा ग्रँडस्लॅम जिंकले तेव्हा मीच का जिंकलो, असे देवाला विचारले नाही मग आत्ताच कशाला विचारू, असा सवाल रश यांनी स्वतःला केल्याचे निरुगडकर यांनी सांगितले.

डॉ. निरुगडकर यांनी स्वतःच्या मानेच्या मणक्याचे अतिशय अवघड असे ऑपरेशन बारा तास चालल्याचा अनुभव सांगितला. ऑपरेशननंतर वर्षभर तुम्ही काहीही करू शकणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र आत्मविश्वास आणि लढाऊ वृत्ती यामुळे फक्त दोन महिन्यांत काम सुरू केले. आंबे असलेल्या झाडालाच लोक दगड मारतात म्हणून लोकांनी नावं ठेवली तरी त्याचा बाऊ करू नका, असे डॉ. निरगुडकर म्हणाले. श्वेता असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. माया तुळपुळे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याविषयीची माहिती दिली. तसेच जनजागृतीसाठी आयोजित करत असलेल्या मॅरेथॉन, जाहीर सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, निबंध स्पर्धा यात भाग घेण्याचे आवाहन केले.

या मेळाव्यास औरंगाबाद, पुणे, अकोला, कल्याण, नवी मुंबई, कोपरखैरणे, ऐरोली, खारघर, अलिबाग, चिपळूण येथून तीस वधू-वर उपस्थित होते. मेळाव्यामुळे पाच ते सहा विवाह ठरण्याची शक्यता आहे. संस्थेतील हजार मुलामुलींचे विवाह आतापर्यंत झाले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज