मुंबई:
'पुलवामा हल्ल्यास पाकिस्तानच जबाबदार आहे. मसूद अजहर मौलाना नाही, तर सैतान आहे. जैश-ए-मोहम्मद नव्हे ती जैश-ए-सैतान संघटना आहे. जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही सर्व एक आहोत हे पाकिस्तानने लक्षात ठेवावे. भारतात विविधतेत एकता आहे. हिंदुस्थानात मशिदीत नमाज अदा होणार, मंदिरात घंटा वाजणार हे लक्षात ठेवा. पाकिस्तानातील राजकारण्यांनी भारतातल्या मुस्लिमांची चिंता करु नये,' अशा शब्दात खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी पाकिस्तानला ठणकावले. पुलवामा हल्ला मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश आहे, अशी टीका करत मोदी सरकार आणि काँग्रेसला धडा शिकवण्याची ही शेवटची संधी आहे, असं म्हणत मतदारांना वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचे आवाहन ओवेसी यांनी केले.
आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेना या दोन प्रस्थापित आघाड्यांना पर्याय देण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमसोबत 'वंचित बहुजन आघाडी'ची स्थापना केली आहे. या आघाडीची मुंबईतली पहिली सभा आज सायंकाळी दादर, शिवाजी पार्क येथे झाली. त्यात ओवेसी बोलत होते. या सभेला वंचित भटके, ओबीसी, आदिवासी, कोळी, आगरी समाजाच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
'अब की बार ना मोदी ना राहुल अब की बार सिर्फ प्रकाश आंबेडकर' असा नारा ओवेसींनी दिला. जर तुम्ही केवळ अल्लाहला घाबरता तर तुम्ही मोदी, राहुल, ठाकरे, पवारांना का घाबरता, आपला अधिकार मिळवा, असे आवाहन ओवेसींनी मुस्लिम बांधवांना केले.
काँग्रेसवर टीका
मुस्लिमांनी काँग्रेसची साथ सोडली पाहिजे. काँग्रेसमुळे मुस्लिमांना केवळ त्रास झाला आहे, अशी टीका ओवेसी यांनी काँग्रेसवर केले. त्यांची महाआघाडी केमिकलमिश्रीत आहे, आमची महाआघाडी नैसर्गिक आहे, असे ओवेसी म्हणाले.
वंचितांचे प्रश्न आम्ही सोडवू - प्रकाश आंबेडकर
महाराष्ट्राचं पाणी इथल्या दुष्काळी भागात देण्याऐवजी गुजरातला जातंय. तापीचं ३५ टीएमसी पाणी गुजरातला दिलं जातंय. या पाण्याने औरंगाबादच्या पाण्याची समस्या मिटू शकेल, पण सरकार कोणतंच नियोजनबद्ध काम करत नाही. आदिवासी समाजाची सद्यस्थिती बिकट आहे. सरकारकडून वंचित समाजाच्या विकासाचा विचार होत नाही. हे सगळं संपवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही. वंचितांचे प्रश्न आम्ही सोडवू, अशी ग्वाही भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.