अ‍ॅपशहर

वसुंधरा पेंडसे-नाईक यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि मराठी, संस्कृत भाषेच्या अभ्यासक वसुंधरा पेंडसे-नाईक (७०) यांचे शुक्रवारी पहाटे पाच वाजता कॅन्सरने दादर येथील शुश्रुषा हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

Maharashtra Times 16 Jul 2016, 4:05 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि मराठी, संस्कृत भाषेच्या अभ्यासक वसुंधरा पेंडसे-नाईक (७०) यांचे शुक्रवारी पहाटे पाच वाजता कॅन्सरने दादर येथील शुश्रुषा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पती क्रिकेटपटू सुधीर नाईक व मुलगी आहे. ज्येष्ठ पत्रकार आप्पा पेंडसे यांच्या त्या कन्या होत्या. परदेशात वास्तव्यास असलेली त्यांची मुलगी भारतात परतल्यानंतर रविवारी पेंडसे-नाईक यांच्यावर दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. वसुंधरा पेंडसे-नाईक यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या सगुण-निर्गुण या लोकप्रिय स्तंभासाठी लेखन केले होते. त्या आधी त्या नवशक्तीच्या संपादक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी पत्रकारितेची सुरुवात लोकसत्तामध्ये सहसंपादक म्हणून केली. त्यानंतर त्या लोकप्रभा या साप्ताहिकाच्या संपादक झाल्या. त्यांनी मराठीमध्ये विपुल लेखन केले. त्यांचे संस्कृतवरही विशेष प्रेम होते. त्यांनी विल्सन महाविद्यालयातून मराठी आणि संस्कृत या दोन्ही विषयांमध्ये स्वतंत्रपणे एम.ए. पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी विल्सन महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणूनही नोकरी केली. दहावीत असताना संस्कृत विषयामध्ये १०० गुण मिळाल्याने त्यांना जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळाली होती. संस्कृतमधील प्रभुत्व आणि सखोल ज्ञानामुळे त्यांना दूरदर्शनवर अमृत मंथन हा कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. या माध्यमातून इंजिनीअरिंग, अर्थशास्त्रापासून अनेक विषयांवरील माहिती त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. त्यांचे कार्यक्रम एवढे गाजले की तात्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी, मुरली देवरा यांच्यामार्फत त्यांना तसाच कार्यक्रम दिल्लीत येऊन हिंदी भाषेत सादर करण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र काही अडचणींमुळे त्या दिल्लीपर्यंत या कार्यक्रमासाठी पोहोचू शकल्या नाहीत. अमृतधारा कार्यक्रम त्यांनी सुमारे १०-१२ वर्षे दूरदर्शनवर सादर केला होता. वसुंधरा पेंडसे-नाईक यांनी राज्य मराठी भाषा विकास संस्था या राज्य सरकारच्या संस्थेवर सुमारे दहा वर्षे संचालक म्हणून काम पाहिले. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले होते. या काळात त्यांनी साहित्य संमेलनांच्या निधीसाठी महाकोषाची संकल्पना पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. कुटुंबकथा, कौटिल्यीय अर्थशास्त्र परिचय, मूल्याधार ही पुस्तके त्यांनी लिहिली. ज्येष्ठ पत्रकार वसुंधरा पेंडसे-नाईक यांच्या निधनाने मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी धडपडणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले आहे. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज