प्रगती बाणखेले
pragati.bankhele@timesgroup.com
…...
सामूहिक संकटांच्या काळात घरगुती हिंसाचारात वाढ होते, हे समाजशास्त्रज्ञांनी आधीपासून नोंदवून ठेवलं आहे. दुष्काळ, पूर, भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती असो की दंगली आणि युद्धासारखी मानवनिर्मित संकटं, हा काळ मुलं आणि महिलांच्या कसोटीचा असतो. मोठ्या साथीचे रोगही याला अपवाद नाहीत.
.....
जगभरात करोना विषाणूमुळे लॉकडाउन आहे. लोक घरांत बंद आहेत. महिना दीड महिना, तर काही ठिकाणी त्याहून अधिक काळ घरात बंद राहण्याची अशी वेळ एकाच वेळी जगाच्या सर्व भागांत कधी आली नव्हती. करोनानंतरचं जग कसं असेल, यावर आत्तापासूनच भविष्यवाणी होऊ लागली आहे. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक पातळीवर होऊ घातलेल्या बदलांची नांदी अनेक पातळ्यांवर दिसूही लागली आहे. पण विषाणूला रोखून माणसांचे जीव वाचवणं याला साहजिकच प्राथमिकता असल्याने वर्तमानातल्या एका महत्त्वाच्या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलेलं दिसत नाही, ती म्हणजे या काळात वाढलेली घरांमधली हिंसा.
पूर्ण कुटुंब चार भिंतींच्या आत २४ तास एकत्र असणं या लॉकडाउनमुळे लादलं गेलं. हे एकत्र असणं काही दिवसांसाठी असेल असं म्हणत आधीचा काळ यातली मौज अनुभवण्यात गेला असला, तरी जसजसा हा काळ वाढत गेला तसतसा या भिंतींआडचा ताणही वाढत गेला आणि गेल्या आठवड्यात साऱ्या जगभरातूनच कौटुंबिक हिंसाचारात मोठी वाढ झाल्याच्या बातम्या येऊन धडकल्या. अमेरिका, युरोपीय देशांपासून पूर्वेकडच्या चीन, भारतापर्यंत सगळीकडूनच आलेल्या या बातम्यांमध्ये बंद दारांआड मुलं आणि बायकांवरील हिंसाचार वाढल्याचं म्हटलं होतं.
सामूहिक संकटांच्या काळात घरगुती हिंसाचारात वाढ होते, हे समाजशास्त्रज्ञांनी आधीपासून नोंदवून ठेवलं आहे. दुष्काळ, पूर, भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती असो की दंगली आणि युद्धासारखी मानवनिर्मित संकटं, हा काळ मुलं आणि महिलांच्या कसोटीचा असतो. मोठ्या साथीचे रोगही याला अपवाद नाहीत.
करोना विषाणूची साथ ज्या चीनमधून सुरू झाली, तिथे घरगुती हिंसाचारात जबर वाढ झाल्याचं तिथल्या सामाजिक संस्थांनी नोंदवलं आहे. न्यूयॉर्क टाइम्समधील एका लेखात नोंदवलेली ही घटना पूर्व चीनमधल्या अनहुई प्रांतातली. लिली ही तरुण विवाहिता. तिला ११ महिन्यांची मुलगी आहे. जानेवारीत या भागात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून लिलीचा पती घरात आहे. त्यांच्यात आधीही कुरबुरी होत. पण आता २४ तास एकत्र राहिल्यानं भाडणं मारहाणीपर्यंत गेली. त्यानं एक दिवस खुर्ची उचलून तिला मारायला सुरुवात केली. तिच्या कडेवर मुलगी होती. मार खाताना ती कोलमडली. पण मुलीला तिनं घट्ट धरून ठेवलं होतं. नवरा पिसाटल्यासारखा खुर्ची पुन्हा पुन्हा तिच्या अंगावर आदळत होता. शेवटी खुर्ची तुटली तेव्हा तो थांबला. लिली रक्तबंबाळ झाली होती. कशीबशी उठून तशा अवस्थेत तिनं स्वत:चे फोटो काढून पोलिसांना पाठवले. लॉकडाउन असूनही पोलिस वेळीच धावून आले म्हणून ती आणि तिची तान्हुली वाचली.
पश्चिम टोकालाही हीच स्थिती आहे. स्पेनमध्ये घरांमधल्या हिंसाचारात १८ टक्के वाढ झालीय, तर ऑस्ट्रेलियात ही वाढ तब्बल ७५ टक्के आहे. फ्रान्समध्ये या घटना ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. फ्रान्समध्ये महिलांच्या मदतीसाठी वेगळीच शक्कल लढवण्यात आली आहे. घरात २४ तास पुरुष असल्याने फोनवरून तक्रार करणं अवघड जातं, म्हणून बायका लॉकडाउनमध्ये सुरू असलेल्या औषधांच्या दुकानात जाऊन विक्रेत्यांकडे 'कोविड १९' असा खुणेचा शब्द उच्चारतात. तिथून पोलिसांकडे सूचना जाते आणि महिलांना मदत मिळते आहे. इटलीमध्येही याच कारणाने मदतीसाठी फोनवर बोलून तक्रार नोंदवण्यापेक्षा टेक्स्ट मेसेज तसंच ईमेल पाठवणं बायकांना सुरक्षित वाटतं आहे.
भारतातही फार वेगळी स्थिती नाही. घरगुती छळाचं प्रमाण लॉकडाउननंतर दुप्पट झाल्याचं केंद्रीय महिला आयोगाचं म्हणणं आहे. महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारी वाढल्या आहेत. २५ मार्च ते २ एप्रिल या काळात महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांच्याकडे महिलांच्या २५७ तक्रारी आल्या. त्यातल्या ६७ तक्रारी घरगुती छळासंदर्भातल्या होत्या, असं त्या सांगतात. तरीही अनेकींनी थोडं सहन करू पण घरातच राहू, असा सुरक्षित मार्ग निवडला आहे. बाहेर साथीचं थैमान सुरू असताना आणि वाहतुकीचे पर्याय बंद असताना बायका, मुलं आणि स्वत:च्या सुरक्षेसाठी घरातच थांबणं पसंत करताहेत. वेगवेगळ्या संस्थाही त्यांना हाच सल्ला देत आहेत.
सगळ्या जगभरातली ही वाढ भीतीदायक असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गटेरेस सांगतात. सगळ्या देशांनी करोनाश लढताना महिलांच्या सुरक्षेसाठीही उपाय योजावेत, असं त्यांनी आग्रहाने सांगितलं आहे.
या साथीमुळे कुटुंबांत नेमकं काय घडतं आहे?
एकतर लहान व्यवसाय चालवणारे, रोजंदारीवर काम करणारे मजूर, नाका कामगार, छोटे कारागीर अशा सगळ्यांचं काम बंद झालं आहे. शिल्लक संपल्यावर घरांत खडखडाट आहे. खाण्यापिण्याच्या गरजा भागवणं हे फार मोठं आव्हान आहे. शहरातील ६० टक्के लोकसंख्या या प्रकारांत मोडते. या ताणाचा निचरा करायला काहीही साधन नाही. नातेवाईक, मित्र यांचीही मदत होण्याची शक्यता नाही. कारण सगळेच जण एकाच बोटीत आहेत. या तणावातून अनेक जण नैराश्याचे शिकार झालेत. भविष्याबद्दल वाटणारं भयही मोठं आहे. यात कुटुंबातले पुरुष,स्त्रिया, मुलं, ज्येष्ठ सगळेच आहेत. या ताणातून एकमेकांना समजून घेणारे, आधार देणारे तग धरून आहेत. मात्र हा ताण दुसऱ्यांवर ढकलून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होऊ लागले की, आधीच कोंडलेली वाफ वेगाने बाहेर यावी, तसं घडतंय. शब्दाने शब्द वाढतोय, त्यातून वाद, भांडण आणि अखेर हाणामारी. मुलं आणि बायका अशावेळी नेहमीच सोपं लक्ष्य ठरतात.
मध्यमवर्गीय कुटुंबात अनेक पुरुषांची कामाच्या ठिकाणी इतरांवर हुकूमत गाजवण्याची, इतरांना नियंत्रित ठेवण्याची सवय घरात अडकून पडल्यामुळे मुला, बायकांना महागात पडतेय. खासगी क्षेत्राने त्याची नखं बाहेर काढायला सुरुवात केलीय. करोनानंतर रोजगारकपात आणि वेतनकपातीच्या बातम्या यायला सुरुवात झाली आहे. या वादळात आपला रोजगार टिकेल का आणि टिकला तर तो होता तसा राहील का, या चिंतेने मध्यमवर्ग कासावीस झाला आहे. चंगळवादी जीवनशैलीतून वाढवून ठेवलेल्या खर्चाची तोंडमिळवणी करताना किती दमछाक होणार आहे, हा ताण हिंसेला निमंत्रण देतो आहे.
दारू, सिगरेट, तंबाखूचं व्यसन असलेल्या पुरुषांची स्थिती आणखी बिकट आहे. त्यांना हव्या तेव्हा या गोष्टी मिळाल्या नाहीत की, मेंदूतील यंत्रणा त्यासाठी आक्रोश करू लागते. दीर्घकाळ व्यसन भागवता आलं नाही, तर स्वत:ला इजा करून घेणं. इतरांना मारहाण हे प्रकार घडतात.
परदेशांत बायका घरांत होणाऱ्या हिंसाचाराविरुद्ध मदत मागण्यासाठी मोठ्या प्रमाणात हेल्पलाइन, हॉटलाइन यांचा वापर करतात. पण भारतात स्थिती वेगळी आहे. आपल्याकडे ३८ टक्के बायका आणि ७१ टक्के पुरुष फोन वापरतात. बायकांना या मदत यंत्रणेबद्दल माहीत असणं, त्याचा वापर करता येणं, त्याबद्दल आत्मविश्वास असणं आणि खुद्द घरातल्या पुरुषाविरोधात तक्रार करण्यासाठी धैर्य असणं अशी सगळी एकत्र मोट बांधता येणं कठीण. त्यात हिंसा करणारा पुरुष २४ तास घरात असेल, तर ते त्याहून कठीण. त्यामुळे अशा आपत्कालात बायका घरांत नक्की काय सहन करत असतील, याचा केवळ अंदाज बांधता येतो. महामारीच्या संकटानंतर एका मोठ्या सामाजिक स्थित्यंतराला सामोरं जावं लागणार आहे. आज केवळ बंद दारांआड कोंडलेले हे हुंदके तेव्हा मोठं आक्रंदन होऊन समोर येणार आहेत.
नुकताच बिहारमधील गया जिल्ह्यात करोनाची लक्षणं असलेल्या एका २५ वर्षांच्या एका तरुणीवर विलगीकरण कक्षातच बलात्कार झाला. नंतर अतिरिक्त रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला. पण ती वेगळी गोष्ट. कारण इथं बायका स्वतः च्या घरात सुरक्षित नाहीत, तिथं करोना कक्षांबद्दल काय बोलावं?