म. टा. प्रतिनिधी, मुंबई
निवडणुकीच्या तोंडावर आयाराम-गयाराम संस्कृती जोपासत सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश करीत उमेदवारी मिळवलेल्या नेत्यांना मतदारांनी यावेळी घरचा रस्ता दाखवला आहे. राज्यातील अशा ३६ जणांपैकी जवळपास निम्म्या जणांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. मतदारसंघातील पाठबळ आणि स्थानिक समीकरण जुळवून आणणारेच नेते या खेळीमध्ये यशस्वी झाल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही काँग्रेसमधील ३६ मातब्बर पुढाऱ्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी पदरात पाडून घेतली होती. त्यातील १६ उमेदवारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखविला आहे. पक्षांतर केलेल्या नेत्यांची यादी पाहता, आघाडीतून युतीमध्ये गेलेल्या नेत्यांमध्ये भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांच्या यशाचे प्रमाण जास्त असून, शिवसेनेत गेलेल्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या १० जणांपैकी सहा जण, तर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या सहाजणांपैकी पाच जण विजयी झाले. काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या चार जणांपैकी केवळ सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचा विजय झाला. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या सहा नेत्यांमध्ये फक्त भास्कर जाधव यांचा गुहागर मतदारसंघातून विजय झाला. माजी मंत्री व भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांनी दारुण पराभव केला आहे. शिवसेनेच्या तिकिटावर लढणारे माजी मंत्री दिलीप सोपल यांचा बार्शीत पराभव झाला असून, भाजपच्या रश्मी बागल यांनाही करमाळ्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.
(पक्षांतराविरोधात भावना...६)