म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
अधून-मधून आलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांचा वीकेण्ड सार्थकी लावला. मुंबईकरांचा वीकेण्ड आणि समुद्रकिनारे हे आवडते समीकरण आहे. त्यात पावसाळ्यात पाऊस अनुभवायला मिळाला की अधिक मजा येते. शुक्रवारी रात्रीपासून एखाद-दुसऱ्या जोरदार सरीसह पाऊस पडायला सुरुवात झाली. शनिवारी सकाळी ८.३० पासून संध्याकाळी ८.३० पर्यंत सांताक्रूझ येथे ३२.१ मिलीमीटर, तर कुलाबा येथे ९.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. येत्या आठवड्यात मुंबईत एखाद-दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.
सध्या मान्सूनचे वारे अरबी समुद्रावर सक्रिय आहेत. परिणामी कोकणामध्ये पुढील चार दिवसांमध्ये एखाद-दुसऱ्या ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही पावसासाठी पुन्हा अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज, रविवारी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात एखाद-दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर रायगडमध्ये मुसळधार ते तीव्र मुसळधार पाऊस पडू शकतो. सोमवारीही रायगडमध्ये हीच परिस्थिती कायम राहू शकते, असे प्रादेशिक हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दक्षिण कोकणातही पुढील दोन दिवस मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाच्या सरी एखाद-दुसऱ्या ठिकाणी पडू शकतात.
...म्हणून पाणी साचले नाही
मुंबईमध्ये शनिवारी रात्री ८.३० पर्यंत स्वयंचलित पर्जन्यमापकांवर झालेल्या नोंदीनुसार पश्चिम उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी ५० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. उपनगरांनी संध्याकाळी ५.३० नंतर अधिक पाऊस अनुभवला. मात्र हा पाऊस अधून-मधून दमदार उपस्थिती लावून काही काळ विश्रांती घेत होता, त्यामुळे पाणी साचण्याची परिस्थिती ओढवली नाही.