अ‍ॅपशहर

मंगेश पाडगावकरांच्या स्मारकाला मुहूर्त कधी?

वेंगुर्ल्याच्या सागरेश्वर येथे पाडगावकरांचे स्मारक उभारण्यासाठी सन २०१८मध्ये अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली. त्यानंतर सन २०१८-१९ साठी निधीही उपलब्ध करून देण्यात आला. मात्र हे स्मारक उभारण्यासाठी गेल्या वर्षीही मुहूर्त मिळाला नाही आणि त्यानंतर वर्ष उलटून गेले तरी हे काम सुरू झालेले नाही, असे 'कोमसाप'चे वांद्रे शाखेचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी सांगितले.

महाराष्ट्र टाइम्स 9 Mar 2020, 7:21 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mangesh-padgaonkar


कवीवर्य मंगेश पाडगावकर यांच्या १० मार्च रोजी येणाऱ्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग सांस्कृतिक केंद्र आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वांद्रे शाखेतर्फे वेंगुर्ला येथील पाडगावकरांच्या स्मारकाची आठवण करून देण्यात आली. मार्च २०१८ मध्ये विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मान्यता मिळालेल्या या स्मारकाला प्रत्यक्षात मुहूर्त कधी मिळणार आहे, अशी विचारणा करण्यात येत आहे.

वेंगुर्ल्याच्या सागरेश्वर येथे पाडगावकरांचे स्मारक उभारण्यासाठी सन २०१८मध्ये अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली. त्यानंतर सन २०१८-१९ साठी निधीही उपलब्ध करून देण्यात आला. मात्र हे स्मारक उभारण्यासाठी गेल्या वर्षीही मुहूर्त मिळाला नाही आणि त्यानंतर वर्ष उलटून गेले तरी हे काम सुरू झालेले नाही, असे 'कोमसाप'चे वांद्रे शाखेचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी सांगितले. गेल्या वर्षीही त्यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता. त्यावेळी स्मारकासाठी निविदा काढण्यासंदर्भात चर्चा झाली होती. मात्र या स्थितीमध्ये बदल झालेला नसल्याने पाडगावकरांच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

या स्मारकाची ही जागा 'एमटीडीसी'ची आहे. स्मारकासंदर्भातील घोषणा झाल्यानंतर पर्यटन विभागाकडून यात दिरंगाई होत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. याचे काम मार्चमध्ये सुरू न झाल्यास यासाठी वितरित झालेला निधी परत जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी तत्काळ या कामाची चौकशी करून स्मारकाच्या कामास गती द्यावी, असे निवेदन जाधव यांनी सरकारला दिले आहे. या स्मारकासाठी 'सीआरझेड'पासून सर्व मंजुरी मिळाल्या आहेत, हे माहिती अधिकारानुसार समोर आले आहे. मात्र पर्यटन सचिवांच्या पातळीवर या कामामध्ये हरकत नोंदली गेल्याचे तसेच स्मारक उभारणे हे पर्यटन महामंडळाचे काम नसल्याने निविदा काढण्याबाबत कुरबुरी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. ही जागा भाडेपट्टीने देण्याचे ठरविल्याने हे स्मारक रेंगाळल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. त्यासंदर्भात सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारला पत्रही पाठवलेले आहे. स्मारकासाठी सर्वच पातळीवर तयारी असेल तर काम नेमके का रेंगाळत आहे, हे चाहत्यांना पडलेले कोडे सुटावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यासंदर्भात पाडगावकरांचा मुलगा डॉ. अजित पाडगावकर यांनी पालकमंत्र्यांनी आश्वासने देऊनही काही कार्यवाही न झाल्याची खंत व्यक्त केली. पाडगावकरांच्या निधनाला या डिसेंबरमध्ये पाच वर्षे पूर्ण होत असून स्मारकासंदर्भात काम पुढे सरकलेले नाही. रीतसर प्रयत्न करूनही काहीही काम सुरू न झाल्याने ही हलगर्जी कोणाची आहे, यासाठी दोष कोणाला द्यायचा असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. पाडगावकरांचे स्मारक रसिकांच्या मनात घर करून आहे. मात्र त्याचे मूर्तरूप सागरेश्वर किनारी लवकरात लवकर साकारावे, अशी मागणी त्यांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज