अ‍ॅपशहर

कशासाठी शिकवायचं मुलांना?

आमच्या मागच्या कैक पिढ्यांनी मातीतच हात घातलं, पोरांबाळांना मातीत पिकं पेरायला शिकवलं, पण आम्ही मात्र मुलांच्या डोळ्यात शिक्षणाचं सपान पेरलं.

Maharashtra Times 13 Mar 2018, 9:57 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farmers


आमच्या मागच्या कैक पिढ्यांनी मातीतच हात घातलं, पोरांबाळांना मातीत पिकं पेरायला शिकवलं, पण आम्ही मात्र मुलांच्या डोळ्यात शिक्षणाचं सपान पेरलं. आज पोटाला चिमटा घेऊन मुलांना शिकवलं, पण पोरांना नोकऱ्या कुठं आहेत?... हा आर्त सवाल आझाद मैदानात आंदोलनासाठी जमलेल्या शेतकरी महिलांनी पुन्हा पुन्हा उपस्थित केला.

नाशिकहून आलेली सुवर्णा जंगम, लक्ष्मीबाई भाळिंदे, जानकी पवार, विठाबाई मोंदळे या सगळ्या अशिक्षित. हक्काच्या पण वनखात्याच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर वर्षानुवर्षं राबणाऱ्या. त्या मजुरीतून मिळेल त्या पैशात घराचं पोटपाणी आणि पोरांचं शिक्षण रेटणाऱ्या.. वेल्हे बुद्रूकच्या आशाबाई दोडके सांगतात, 'दहा वर्षांपूर्वी गावातल्या एका जोडीदारणीचा मुलगा शिकला, मुंबईला आला. तिची परिस्थिती बदलली, ताब्यात असलेली जमीन तिने सोडवली. मुलांना शिकवलं पाहिजे, हे स्वप्न पाहिलं. पोटाला चिमटा काढून मुलाला एमए केलं. पण गावात कामधंदा नाही. सरकारी योजनांचे फॉर्म भरूनभरून पोरगा थकला, शेवटी मजुरी करायची वेळ आली.' सुवर्णा यांच्या मुलाप्रमाणेच भिलाबाईंचा मुलगाही बीकॉम झाला. त्याला नाशिकला वसतिगृहावर ठेवून पदरमोड करून शिकवला. अंथरुण नसतानाही पाय पसरले, मुलांवर मजुरीची तेव्हा वेळ आणली नाही, शिक्षण मिळालं तर नोकरी मिळेल म्हणून वाट पाहिली, पण आज गावांमध्ये काम नाही. कुणाची द्राक्षं खुडायला जा, कुणाच्या जनावारांना पाणी दे, तर कुणाच्या घरी पाणी पोहचवं, अशी काम शिकलेली मुलं करतात. 'पतपेढ्यांमध्ये, सहकारी संस्थामध्ये पूर्वी काम मिळायची,' आईच्या सोबतीसाठी नाशिकच्या पिठे गावातून आलेला शंभा पाटील सांगतो, 'पण नोटंबंदीनंतर इथले व्यवहारही ढेपाळलेत. आहेत त्याच कामगारांचे पगार निघत नाहीत, नव्याने भरती कशी घेणार? ओळखीच्या एक दोन जणांनी एकशेआठ क्रमाकांच्या रुग्णवाहिकेवर ड्रायव्हरची नोकरी मिळवली, दिवस भरू तितके पैसे मिळतात, पण शिक्षणाचा आणि या नोकरीचा संबध काय,' शंभाला प्रश्न पडतो.

नोकऱ्या मिळणार नसतील, तर सरकार मुलांना शिकवा का म्हणते, या प्रश्नांचं उत्तर या शेतकरी महिलांना हवं आहे, त्यांची शिकली-सवरली मुलं नोकरीधंदा मिळेल, या आशेने धीर धरून आहेत. पण दुष्काळाने खंगलेल्या, माणसांनी नाडलेल्या या शेतकरी महिलांचा संयम मात्र आता सुटत चालला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज