म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बदललेल्या झेंड्यातून प्रतीत होणारा विचार महाराष्ट्र कितपत स्वीकारेल यावर त्या पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी येथे दिली.
मनसेच्या स्थापनेपासून इंजिन हे पक्षचिन्ह आहे. त्यांनी आता अचानक झेंडा बदलला आहे. मनसेचा हा नवीन अवतार आहे. नवीन झेंडा आहे. भाषा आणि विचार बदलले आहेत. त्यामुळे ते रुजण्यासाठी तेवढाच काळ लागेल. भाजपची हिंदू व्होटबँक असल्याने मनसेने भगवा झेंडा हाती घेतल्यानंतर भाजपच्या पोटात धस्स झाले, असे ते म्हणाले.
कोणता झेंडा हातात घेऊ, अशी राज ठाकरे यांची स्थिती झाली आहे. शॅडो कॅबिनेट म्हणजे लहान माझी बाहुली तिची मोठी सावली असा प्रकार आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. हेमंत टकले यांनी केली. सभांना जमणारी गर्दी कार्यकर्त्यांमध्ये कशी रुपांतरित होईल यासाठी राज यांनी प्रयत्न करावेत. एकांगी कारभार करायची सवय असेल, तर पदाधिकाऱ्यांची फळी उभी राहत नाही हे त्यांनी समजून घ्यावे, असा टोला टकले यांनी लगावला.