म. टा. प्रतिनिधी, मुंबई
भारतीय राज्यघटनेचे सर्वोच्च महत्त्व टिकवून ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. घटनेमध्ये तरतूद केल्याप्रमाणे जात, धर्म, पंथ, लिंग, प्रदेश असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी राष्ट्रपती झाल्यानंतर आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रातील सत्ताधारी भाजपप्रणित रालोआचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी शनिवारी मुंबईत लोकप्रतिनिधींसमोर बोलताना दिली. रामनाथ कोविंद विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास भाजपसह रालोआच्या अन्य घटक पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रपतीपदासाठी उद्या, सोमवारी निवडणूक होत असून, महाराष्ट्रातील आमदार, खासदारांशी संवाद साधण्यासाठी रामनाथ कोविंद यांनी शनिवारी मुंबईतील गरवारे क्लबमध्ये बैठक घेतली. भाजपसह रालोआचे घटकपक्ष असलेले शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांशी त्यांनी संवाद साधला. शिवसेनेचे मंत्रीही या बैठकीला उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचा अपवाद वगळता सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. तत्पूर्वी रामनाथ कोविंद यांचे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. केंद्रिय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यावेळी कोविंद यांना शुभेच्छा दिल्या.
‘रामनाथ कोविंद हे मोठे कर्तृत्व, व्यासंग असलेले शालीन व्यक्तमित्व आहे. रालोआने राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली आहे. त्यांना ऐतिहासिक यश मिळेल’, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. तर ‘कोविंद यांच्याकडे संघटन कौशल्य व प्रशासकीय कौशल्य आहे. ते राज्यघटनेचे जाणकार आहेत. त्यांना महाराष्ट्रातून मोठे मताधिक्य मिळेल’, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
देशातील सर्व राज्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व सर्वांना समान न्याय मिळावा, देशातील युवावर्गाच्या आशाआकांक्षा पूर्ण करणे तसेच शिक्षणाचा प्रसार व आधुनिकीकरण हे आपले प्राधान्याचे विषय असतील. राष्ट्रपतीपदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे कोविंद यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
‘स्वच्छ प्रतिमा, साधेपणा व विनम्रता ही रामनाथ कोविंद यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे’, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. आंबेडकरी चळवळीशी संबंध असलेले रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होणार याचा सर्वांना आनंद आहे, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. आपण त्यांना रिपब्लिकन पक्ष, आंबेडकरी चळवळ व दलित जनतेतर्फे शुभेच्छा देतो, असेही आंबेडकर म्हणाले.
या बैठकीस भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय, रासपचे अध्यक्ष, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, केंद्रीय मंत्री अनंत गीते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट, बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. नित्यानंद राय, खा. सुनील सिंग उपस्थित होते.
शिवसेनेची मते कोविंद यांनाच
रालोआच्या उमेदवाराला विजयी करण्याचा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यानुसार शिवसेनेचे सर्व खासदार व आमदार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मते देतील, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.
भारतीय राज्यघटनेचे सर्वोच्च महत्त्व टिकवून ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. घटनेमध्ये तरतूद केल्याप्रमाणे जात, धर्म, पंथ, लिंग, प्रदेश असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी राष्ट्रपती झाल्यानंतर आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रातील सत्ताधारी भाजपप्रणित रालोआचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी शनिवारी मुंबईत लोकप्रतिनिधींसमोर बोलताना दिली. रामनाथ कोविंद विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास भाजपसह रालोआच्या अन्य घटक पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रपतीपदासाठी उद्या, सोमवारी निवडणूक होत असून, महाराष्ट्रातील आमदार, खासदारांशी संवाद साधण्यासाठी रामनाथ कोविंद यांनी शनिवारी मुंबईतील गरवारे क्लबमध्ये बैठक घेतली. भाजपसह रालोआचे घटकपक्ष असलेले शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांशी त्यांनी संवाद साधला. शिवसेनेचे मंत्रीही या बैठकीला उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचा अपवाद वगळता सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. तत्पूर्वी रामनाथ कोविंद यांचे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. केंद्रिय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यावेळी कोविंद यांना शुभेच्छा दिल्या.
‘रामनाथ कोविंद हे मोठे कर्तृत्व, व्यासंग असलेले शालीन व्यक्तमित्व आहे. रालोआने राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली आहे. त्यांना ऐतिहासिक यश मिळेल’, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. तर ‘कोविंद यांच्याकडे संघटन कौशल्य व प्रशासकीय कौशल्य आहे. ते राज्यघटनेचे जाणकार आहेत. त्यांना महाराष्ट्रातून मोठे मताधिक्य मिळेल’, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
देशातील सर्व राज्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व सर्वांना समान न्याय मिळावा, देशातील युवावर्गाच्या आशाआकांक्षा पूर्ण करणे तसेच शिक्षणाचा प्रसार व आधुनिकीकरण हे आपले प्राधान्याचे विषय असतील. राष्ट्रपतीपदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे कोविंद यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
‘स्वच्छ प्रतिमा, साधेपणा व विनम्रता ही रामनाथ कोविंद यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे’, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. आंबेडकरी चळवळीशी संबंध असलेले रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होणार याचा सर्वांना आनंद आहे, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. आपण त्यांना रिपब्लिकन पक्ष, आंबेडकरी चळवळ व दलित जनतेतर्फे शुभेच्छा देतो, असेही आंबेडकर म्हणाले.
या बैठकीस भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय, रासपचे अध्यक्ष, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, केंद्रीय मंत्री अनंत गीते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट, बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. नित्यानंद राय, खा. सुनील सिंग उपस्थित होते.
शिवसेनेची मते कोविंद यांनाच
रालोआच्या उमेदवाराला विजयी करण्याचा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यानुसार शिवसेनेचे सर्व खासदार व आमदार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मते देतील, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.