म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
'टिकली अँड लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटाच्या निमित्ताने देहविक्री करणाऱ्या महिलांचे जग समोर आले, तेव्हा यामध्ये स्त्रिया महत्त्वाच्या असल्या, तरी यावर पुरुषांचे संपूर्ण नियंत्रण असल्याचे जाणवले. यामध्ये महिलांचे पुरुषांकडून शोषण होत असल्याचे जाणवले. मात्र केवळ देहविक्रीच नाही, तर कोणत्याही क्षेत्रात पितृसत्ताक पद्धतीमुळे महिलांचे शोषण होत आहे, असे परिस्थितीचे वास्तवदर्शी चित्रण अभिनेत्री विभावरी देशपांडे यांनी केले.
कॉर्पोरेट, मीडिया, सिनेमा या प्रत्येक क्षेत्रामध्येच पितृसत्ताक पद्धती आहे. त्यामुळे ही पद्धत बदलता येणार नाही का, हा विचार केला जायला हवा. 'टिकली आणि लक्ष्मी बॉम्ब'मध्ये देहविक्री हा व्यावसायिकतेचा भाग समजून ही पितृसत्ताक पद्धत मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी नवीन यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. महिलांचे शोषण टाळण्यासाठी अशीच नवीन यंत्रणा तयार करता येणार नाही का, असा प्रश्न उपस्थित करत विभावरी यांनी समाजाच्या विचारांना चालना देण्याचा प्रयत्न केला. या गप्पांमध्ये त्यांनी केवळ महिलाच नाही, तर तृतीयपंथी, लिंगबदल केलेल्या व्यक्ती यांचाही मानवी पातळीवर विचार करण्याचे आवाहन केले. केवळ शरीर आणि लैंगिकता म्हणजे स्त्री नाही. स्त्रीत्व हे त्या पलीकडे काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या. महिला दिनाचा विचार करताना तृतीयपंथीयांना वगळून चालणार नाही, याची जाणीव त्यांनी पुन्हा एकदा समाजाला करून दिली.
महिला दिनाचा विचार करताना महिलांना आपणच कमी लेखतो मात्र ते आपल्याला समजत नाही, असे सांगत त्यांनी मुलांना मुलगा किंवा मुलगी म्हणून न वाढवता माणूस म्हणून वाढवले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली. तुम्ही मुलांना माणूस म्हणून कसे वाढवता, यावर त्यांची भविष्यातील वर्तणूक अवलंबून असते. मुलीसारखा काय रडतोस किंवा मी माझ्या मुलीला मुलासारखे वाढवले आहे, असे म्हणताना आपण मुलींना आणि महिलांना कमी लेखतो, त्यामुळे यामध्ये बदल होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. विविध अंगांनी महिलांचे सबलीकरण होणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या.
निर्णय स्वातंत्र्य, नाट्यचळवळीने घडवले
विभावरी यांना त्यांच्या पालकांनी लहानपणापासून निर्णयस्वातंत्र्य आणि त्या निर्णयांच्या परिणामांना तोंड देण्यास शिकवल्याने त्यांचा आतापर्यंतचा प्रवास 'सक्षम मी' याच पद्धतीने पार पडला आहे, असे त्यांनी सांगितले. पुण्यातील इंटरनॅशनल बुक डेपो हा त्यांच्या आजोबांचा. त्यामुळे लहानपणापासूनच वैविध्यपूर्ण विषयांचे ज्ञान मिळाले. त्यांची आई आणि आजी दोघींनीही नाट्यलेखन केले होते. त्यामुळे नाटकाशी नाळही लहानपणीच जुळली. विभावरी १४व्या वर्षी सत्यदेव दुबेंना भेटल्या. आठव्या वर्षांपासूनच त्यांनी ग्रिप्स थिएटरची नाटके पाहायला सुरुवात केली होती. आजही त्या ग्रिप्स थिएटर चळवळीशी जोडलेल्या आहेत. यातून बालरंगभूमीसाठी समर्थ काम करण्यासाठी दिशा आणि पाठबळ मिळाले आहे. आई-वडिलांनी दिलेले निर्णयस्वातंत्र्य, चुका करण्याची संधी, सत्यदेव दुबेंसारख्या श्रेष्ठ रंगकर्मीकडून मिळालेल मार्गदर्शन या बळावर त्यांनी एकेक नको असलेली गोष्ट नाकारत नेमके काय हवे आहे, याचा अभ्यास केला आणि प्रवास केला. या प्रवासात महेश एलकुंचवार यांचे लाभलेले मार्गदर्शन, श्रीरंग गोडबोले यांनी सोपवलेली जबाबदारी आणि यातून लेखणीला मिळालेले बळ अशा गप्पाही रंगल्या. या गप्पांमधून विभावरी देशपांडे यांची महिला कलाकार, लेखिका म्हणून झालेली स्थित्यंतरे समोर आली. हिंदी आणि मराठीतील अभिनेत्रींकडे पाहण्याचा दृष्टिकोन, टीव्हीच्या पडद्यावरील स्त्री, त्या स्त्री पात्रांचे झालेले आरेखन, त्याची गरज, ग्रामीण भागातील महिलांचा छोट्या पडद्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असे विविध पैलू या स्थित्यंतराच्या निमित्ताने समोर आले. शहरी वास्तवातील स्त्रीचे प्रतिबिंब टीव्ही माध्यमामध्ये उमटायला वेळ लागेल, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
पुढच्या पिढ्या घडवण्याची जबाबदारी
लहान मुलांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन, माणूस म्हणून त्यांच्यासाठी गरजेचा असलेला सन्मान, दृक्-चित्र माध्यमांनी लहान मुलांच्या कल्पनाशक्तीवर केलेला परिणाम, टीव्ही-चित्रपटांच्या ग्लॅमरने पालकांचा आपल्या मुलांकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन, मुलांना ग्लॅमर मिळावे म्हणून धडपडणारे पालक यावरही त्यांनी भाष्य केले. महिला दिनाच्या निमित्ताने केवळ महिला म्हणून स्वतःकडे कसे पाहता याचा विचार होण्यापेक्षा येणाऱ्या पिढ्यांनाही आपण कसे घडवतो, याचा विचार होणेही गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ही बदलाची प्रक्रिया माणूस म्हणून बालपणापासूनच व्हायला हवी. सबलीकरण हे स्वतःतूनच येते. त्यामुळे या अंतःप्रेरणा समजून घ्या, असेही त्यांनी पुन्हापुन्हा आवर्जून सांगितले.
'टिकली अँड लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटाच्या निमित्ताने देहविक्री करणाऱ्या महिलांचे जग समोर आले, तेव्हा यामध्ये स्त्रिया महत्त्वाच्या असल्या, तरी यावर पुरुषांचे संपूर्ण नियंत्रण असल्याचे जाणवले. यामध्ये महिलांचे पुरुषांकडून शोषण होत असल्याचे जाणवले. मात्र केवळ देहविक्रीच नाही, तर कोणत्याही क्षेत्रात पितृसत्ताक पद्धतीमुळे महिलांचे शोषण होत आहे, असे परिस्थितीचे वास्तवदर्शी चित्रण अभिनेत्री विभावरी देशपांडे यांनी केले.
कॉर्पोरेट, मीडिया, सिनेमा या प्रत्येक क्षेत्रामध्येच पितृसत्ताक पद्धती आहे. त्यामुळे ही पद्धत बदलता येणार नाही का, हा विचार केला जायला हवा. 'टिकली आणि लक्ष्मी बॉम्ब'मध्ये देहविक्री हा व्यावसायिकतेचा भाग समजून ही पितृसत्ताक पद्धत मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी नवीन यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. महिलांचे शोषण टाळण्यासाठी अशीच नवीन यंत्रणा तयार करता येणार नाही का, असा प्रश्न उपस्थित करत विभावरी यांनी समाजाच्या विचारांना चालना देण्याचा प्रयत्न केला. या गप्पांमध्ये त्यांनी केवळ महिलाच नाही, तर तृतीयपंथी, लिंगबदल केलेल्या व्यक्ती यांचाही मानवी पातळीवर विचार करण्याचे आवाहन केले. केवळ शरीर आणि लैंगिकता म्हणजे स्त्री नाही. स्त्रीत्व हे त्या पलीकडे काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या. महिला दिनाचा विचार करताना तृतीयपंथीयांना वगळून चालणार नाही, याची जाणीव त्यांनी पुन्हा एकदा समाजाला करून दिली.
महिला दिनाचा विचार करताना महिलांना आपणच कमी लेखतो मात्र ते आपल्याला समजत नाही, असे सांगत त्यांनी मुलांना मुलगा किंवा मुलगी म्हणून न वाढवता माणूस म्हणून वाढवले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली. तुम्ही मुलांना माणूस म्हणून कसे वाढवता, यावर त्यांची भविष्यातील वर्तणूक अवलंबून असते. मुलीसारखा काय रडतोस किंवा मी माझ्या मुलीला मुलासारखे वाढवले आहे, असे म्हणताना आपण मुलींना आणि महिलांना कमी लेखतो, त्यामुळे यामध्ये बदल होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. विविध अंगांनी महिलांचे सबलीकरण होणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या.
निर्णय स्वातंत्र्य, नाट्यचळवळीने घडवले
विभावरी यांना त्यांच्या पालकांनी लहानपणापासून निर्णयस्वातंत्र्य आणि त्या निर्णयांच्या परिणामांना तोंड देण्यास शिकवल्याने त्यांचा आतापर्यंतचा प्रवास 'सक्षम मी' याच पद्धतीने पार पडला आहे, असे त्यांनी सांगितले. पुण्यातील इंटरनॅशनल बुक डेपो हा त्यांच्या आजोबांचा. त्यामुळे लहानपणापासूनच वैविध्यपूर्ण विषयांचे ज्ञान मिळाले. त्यांची आई आणि आजी दोघींनीही नाट्यलेखन केले होते. त्यामुळे नाटकाशी नाळही लहानपणीच जुळली. विभावरी १४व्या वर्षी सत्यदेव दुबेंना भेटल्या. आठव्या वर्षांपासूनच त्यांनी ग्रिप्स थिएटरची नाटके पाहायला सुरुवात केली होती. आजही त्या ग्रिप्स थिएटर चळवळीशी जोडलेल्या आहेत. यातून बालरंगभूमीसाठी समर्थ काम करण्यासाठी दिशा आणि पाठबळ मिळाले आहे. आई-वडिलांनी दिलेले निर्णयस्वातंत्र्य, चुका करण्याची संधी, सत्यदेव दुबेंसारख्या श्रेष्ठ रंगकर्मीकडून मिळालेल मार्गदर्शन या बळावर त्यांनी एकेक नको असलेली गोष्ट नाकारत नेमके काय हवे आहे, याचा अभ्यास केला आणि प्रवास केला. या प्रवासात महेश एलकुंचवार यांचे लाभलेले मार्गदर्शन, श्रीरंग गोडबोले यांनी सोपवलेली जबाबदारी आणि यातून लेखणीला मिळालेले बळ अशा गप्पाही रंगल्या. या गप्पांमधून विभावरी देशपांडे यांची महिला कलाकार, लेखिका म्हणून झालेली स्थित्यंतरे समोर आली. हिंदी आणि मराठीतील अभिनेत्रींकडे पाहण्याचा दृष्टिकोन, टीव्हीच्या पडद्यावरील स्त्री, त्या स्त्री पात्रांचे झालेले आरेखन, त्याची गरज, ग्रामीण भागातील महिलांचा छोट्या पडद्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असे विविध पैलू या स्थित्यंतराच्या निमित्ताने समोर आले. शहरी वास्तवातील स्त्रीचे प्रतिबिंब टीव्ही माध्यमामध्ये उमटायला वेळ लागेल, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
पुढच्या पिढ्या घडवण्याची जबाबदारी
लहान मुलांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन, माणूस म्हणून त्यांच्यासाठी गरजेचा असलेला सन्मान, दृक्-चित्र माध्यमांनी लहान मुलांच्या कल्पनाशक्तीवर केलेला परिणाम, टीव्ही-चित्रपटांच्या ग्लॅमरने पालकांचा आपल्या मुलांकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन, मुलांना ग्लॅमर मिळावे म्हणून धडपडणारे पालक यावरही त्यांनी भाष्य केले. महिला दिनाच्या निमित्ताने केवळ महिला म्हणून स्वतःकडे कसे पाहता याचा विचार होण्यापेक्षा येणाऱ्या पिढ्यांनाही आपण कसे घडवतो, याचा विचार होणेही गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ही बदलाची प्रक्रिया माणूस म्हणून बालपणापासूनच व्हायला हवी. सबलीकरण हे स्वतःतूनच येते. त्यामुळे या अंतःप्रेरणा समजून घ्या, असेही त्यांनी पुन्हापुन्हा आवर्जून सांगितले.