मुंबई
लहान मुलांशिवाय घराला घरपण नसते, असे म्हणतात. पण क्षयरोगाची लागण झालेल्या अशा अनेक मुलांकडे त्यांची हक्कांची माणसे, कुटुंबे पाठ फिरवून निघून जातात. क्षयरोग बरा होत नाही, हा गैरसमज नुकत्याच उमलणाऱ्या या मुलांच्या भविष्यावर कायमची काजळी धरतो. औषधोपचार आणि पोषण आहारांच्या योजनांमुळे क्षयरोगाशी दोन हात करता येतात, पण व्याधीमुक्त झालेल्या या मुलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो.
एकूण क्षयरुग्णांमध्ये लहान मुलांना होणाऱ्या क्षयाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मार्च २०१७ ते एप्रिल २०१८ या कालावधीमध्ये राज्यात १ हजार ७०९ मुलांना क्षयरोगाची लागण झाली. मुंबई, पालघर आणि ठाणे या तीन ठिकाणी हे प्रमाण सर्वाधिक आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, क्षयाच्या एक हजार ७०९ रुग्णांपैकी ६८५ म्हणजे चाळीस टक्के मुले ही मुंबईतील आहेत. साडेचारशेहून अधिक मुले पालघरमध्ये, तर शंभरहून अधिक ठाण्यामध्ये आढळून आली आहे. २०१७ मध्ये मुंबईमध्ये क्षयरोगाचे जे ४५ हजार ६७५ रुग्ण आढळले, त्यातील औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णांमध्ये मुलांचे प्रमाण वाढते असल्याचे दिसून आले आहे.
लहान मुलांना भूक लागत नाही, वजन वाढत नाही, महिनाभराहून अधिक काळ ताप आदी लक्षणांसाठी खासगी डॉक्टरांकडे वा बालरोगतज्ज्ञांकडे आणण्यात आले, तर त्वरित क्षयासाठी निदान चाचणी व्हायला हवी, असे शिवडी क्षयरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अमर पवार सांगतात. प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही. क्षयरोगाच्या निदान चाचण्या व त्यानंतर नियमावलीनुसार त्वरित उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे लहान मुलांमध्ये क्षयरोग बळावतो. मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये काहीही खाण्याची तीव्र इच्छा नसते, त्यामुळे केवळ औषधोपचार देऊन रोगप्रतिकारशक्ती वाढत नाही. मोठ्यांमधील क्षयासाठी देण्यात आलेली जी नियमावली, औषधे, प्रतिजैविकांची तीच मात्रा मुलांमध्येही वापरायची की नाही, यासंदर्भात अद्याप बालरोगतज्ज्ञांमध्येही संभ्रम दिसून येतो. औषधांची मात्रा मुलांचे वजन आणि वय यांच्या निकषानुसार ठरवली जाते. अन्य आजारांनी बाधित मुलांना ही उपचारपद्धती कशी सुरू करायची, हे नियमावलीमध्ये सुस्पष्टपणे देणे अपेक्षित आहे.
मोठी माणसे हा लहान मुलांमध्ये क्षयाचा संसर्ग पसरवण्यासाठी सर्वात प्रमुख स्रोत असतात. लहान मुलांमध्ये खोकल्याचे लक्षण प्रामुख्याने दिसत नाही, त्यांच्यामध्ये भूक न लागणे, वजन कमी होणे ही लक्षणे प्रामुख्याने दिसतात. त्यामुळे त्यादृष्टीने डॉक्टरांनी याची नोंद घ्यायला हवी, असा आग्रह ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत चोरघडे व्यक्त करतात.
आज भारतामध्ये लहान मुलांमधील क्षयरोग वाढता आहे. त्यामुळे उपचारांची दिशा बदलण्याची गरज बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते व्यक्त करतात. लसीकरणासह मॉन्टुक पद्धतीच्या तपासण्याही क्षयनिदानासाठी मदतगार ठरू शकतात. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे क्षयावर मात करणे तुलनेने सोपे आहे, याकडेही ते लक्ष वेधतात.
समाजाने क्षयसाक्षर व्हावे
व्याधीमुक्त झालेल्या अनेक मुलांचे आजार कुटुंबाकडून जाणीवपूर्वक लपवले जातात. क्षय झाल्याचे कळले, तर शाळेत पुन्हा घेतले जाईल का, समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळेल का, असा प्रश्न पालकांच्या मनामध्ये असतो. त्यासाठी पालकांचे समुपदेशन करण्याची गरज असते. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती मोठ्यांच्या तुलनेमध्ये चांगली असल्याने आजार बरा होण्याची क्षमताही अधिक असते. त्यामुळे लहान मुलांना क्षयरोगाची लागण झाली, तर त्यांचा स्वीकार, उपचार आणि पुनर्वसन या तिन्ही पातळ्यांवर विचार करण्याची गरज वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
लहान मुलांशिवाय घराला घरपण नसते, असे म्हणतात. पण क्षयरोगाची लागण झालेल्या अशा अनेक मुलांकडे त्यांची हक्कांची माणसे, कुटुंबे पाठ फिरवून निघून जातात. क्षयरोग बरा होत नाही, हा गैरसमज नुकत्याच उमलणाऱ्या या मुलांच्या भविष्यावर कायमची काजळी धरतो. औषधोपचार आणि पोषण आहारांच्या योजनांमुळे क्षयरोगाशी दोन हात करता येतात, पण व्याधीमुक्त झालेल्या या मुलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो.
एकूण क्षयरुग्णांमध्ये लहान मुलांना होणाऱ्या क्षयाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मार्च २०१७ ते एप्रिल २०१८ या कालावधीमध्ये राज्यात १ हजार ७०९ मुलांना क्षयरोगाची लागण झाली. मुंबई, पालघर आणि ठाणे या तीन ठिकाणी हे प्रमाण सर्वाधिक आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, क्षयाच्या एक हजार ७०९ रुग्णांपैकी ६८५ म्हणजे चाळीस टक्के मुले ही मुंबईतील आहेत. साडेचारशेहून अधिक मुले पालघरमध्ये, तर शंभरहून अधिक ठाण्यामध्ये आढळून आली आहे. २०१७ मध्ये मुंबईमध्ये क्षयरोगाचे जे ४५ हजार ६७५ रुग्ण आढळले, त्यातील औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णांमध्ये मुलांचे प्रमाण वाढते असल्याचे दिसून आले आहे.
लहान मुलांना भूक लागत नाही, वजन वाढत नाही, महिनाभराहून अधिक काळ ताप आदी लक्षणांसाठी खासगी डॉक्टरांकडे वा बालरोगतज्ज्ञांकडे आणण्यात आले, तर त्वरित क्षयासाठी निदान चाचणी व्हायला हवी, असे शिवडी क्षयरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अमर पवार सांगतात. प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही. क्षयरोगाच्या निदान चाचण्या व त्यानंतर नियमावलीनुसार त्वरित उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे लहान मुलांमध्ये क्षयरोग बळावतो. मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये काहीही खाण्याची तीव्र इच्छा नसते, त्यामुळे केवळ औषधोपचार देऊन रोगप्रतिकारशक्ती वाढत नाही. मोठ्यांमधील क्षयासाठी देण्यात आलेली जी नियमावली, औषधे, प्रतिजैविकांची तीच मात्रा मुलांमध्येही वापरायची की नाही, यासंदर्भात अद्याप बालरोगतज्ज्ञांमध्येही संभ्रम दिसून येतो. औषधांची मात्रा मुलांचे वजन आणि वय यांच्या निकषानुसार ठरवली जाते. अन्य आजारांनी बाधित मुलांना ही उपचारपद्धती कशी सुरू करायची, हे नियमावलीमध्ये सुस्पष्टपणे देणे अपेक्षित आहे.
मोठी माणसे हा लहान मुलांमध्ये क्षयाचा संसर्ग पसरवण्यासाठी सर्वात प्रमुख स्रोत असतात. लहान मुलांमध्ये खोकल्याचे लक्षण प्रामुख्याने दिसत नाही, त्यांच्यामध्ये भूक न लागणे, वजन कमी होणे ही लक्षणे प्रामुख्याने दिसतात. त्यामुळे त्यादृष्टीने डॉक्टरांनी याची नोंद घ्यायला हवी, असा आग्रह ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत चोरघडे व्यक्त करतात.
आज भारतामध्ये लहान मुलांमधील क्षयरोग वाढता आहे. त्यामुळे उपचारांची दिशा बदलण्याची गरज बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते व्यक्त करतात. लसीकरणासह मॉन्टुक पद्धतीच्या तपासण्याही क्षयनिदानासाठी मदतगार ठरू शकतात. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे क्षयावर मात करणे तुलनेने सोपे आहे, याकडेही ते लक्ष वेधतात.
समाजाने क्षयसाक्षर व्हावे
व्याधीमुक्त झालेल्या अनेक मुलांचे आजार कुटुंबाकडून जाणीवपूर्वक लपवले जातात. क्षय झाल्याचे कळले, तर शाळेत पुन्हा घेतले जाईल का, समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळेल का, असा प्रश्न पालकांच्या मनामध्ये असतो. त्यासाठी पालकांचे समुपदेशन करण्याची गरज असते. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती मोठ्यांच्या तुलनेमध्ये चांगली असल्याने आजार बरा होण्याची क्षमताही अधिक असते. त्यामुळे लहान मुलांना क्षयरोगाची लागण झाली, तर त्यांचा स्वीकार, उपचार आणि पुनर्वसन या तिन्ही पातळ्यांवर विचार करण्याची गरज वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.