म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मंत्रालयाच्या मुख्य वास्तूतील दुसऱ्या मजल्यावर लावलेल्या संरक्षक जाळीवर उडी मारून एका पुणेकर तरुणाने सोमवारी दुपारी स्टंटबाजी केली. या तरुणाने सुमारे अर्धा तास केलेली ही स्टंटबाजी पाहण्यासाठी मंत्रालयातील साऱ्याच मजल्यांवरील अधिकारी, कर्मचारी व अभ्यागतांची एकच गर्दी झाली होती. अखेर पोलिसांनी जाळीवर जाऊन लक्ष्मण चव्हाण नावाच्या या तरुणाला सुखरुप बाहेर काढले असून त्याची पोलिस चौकशी सुरू आहे.
मंत्रालयात सोमवारी दुपारी चारच्या सुमारास पुण्यातील कोथरुडच्या उजवी भुसारी कॉलनीतील रहिवासी असलेल्या लक्ष्मण अप्पासाहेब चव्हाण या चाळिशीच्या युवकाने संरक्षक जाळीवर उडी मारली. काही जणांच्या म्हणण्यानुसार चव्हाण दुसऱ्या मजल्यावरील या जाळीवर चालतच गेला आणि मध्यभागी जाऊन बसला. त्यानंतर पोलिस त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत असताना, त्या युवकाने सर्कशीतील जाळीप्रमाणे दुसरीकडे सरकण्याचा प्रयत्न केला. त्याची सुटका करण्यासाठी गेलेला एक पोलिस काही काळ जाळीतच अडकला होता. मंत्रालयातील सारे पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यांनाही क्षणभर काय करावे हे कळेनासे झाले. बाळासाहेब रणखांबे नावाच्या एका पोलिस कॉन्स्टेबलने जाळीवर उडी घेत चव्हाणला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र चव्हाण चलाखीने लांब जायचा. अशावेळी वन विभागात कंत्राटी तत्त्वावर असलेला राजेश नामदास या साताऱ्यातील युवकाने पोलिसांच्या परवानगीने जाळीवर धाव घेतली. जाळीवरून राजेश लोळतच चव्हाणपर्यंत पोहचला. जवळ जाऊन त्याने त्याला बाहेर येण्यास विनवणी करू लागला. मात्र काही केल्या बाहेर येण्यास त्याने नकार दिला. पाठशिवणीचा हा खेळ दहा मिनिटे सुरू होता.
पोलिसही जास्त संख्येने जाळीवर उतरू शकत नव्हते. कारण इतक्या वजनाने जाळी तुटली असती. अग्निशमन दलाचे जवानदेखील रोप घेऊन घटनास्थळी आले. अखेर राजेशने चव्हाणला गोड बोलून बाहेर काढण्यात यश मिळवले. हा प्रकार पाहण्यास एकच गर्दी जमली होती. चव्हाणला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा श्वास सोडला. सुरुवातीला या तरुणाने स्वतःचे नाव दशरथ शिंदे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्रालयातील प्रवेश पत्रावर त्याचे नाव लक्ष्मण चव्हाण असे आढळून आले.
चव्हाण याच्या मागण्या
लक्ष्मण चव्हाण हा प्रजासत्ताक भारत पक्ष नावाच्या पक्षसंघटनेचा प्रमुख आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू, माता मृत्यू जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री, मंत्री आमदारांनी शासकीय निवासस्थाने अथवा अन्य व्हीव्हीआयपी सुविधांचा त्याग करावा. पुरोगामी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री झालीच पाहिजे, लोकसभा आणि विधानसभेत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असावे. आमदारांची व्हीव्हीआयपी सुविधा काढून टाकावी. आमदारांचे पेन्शन रद्द करावे, पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्यासाठी अनुक्रमे प्रधानसेवक आणि मुख्य सेवक या शब्दासाठी स्वतंत्र कायदा करावा, मंत्रालयाचे नाव सेवालय व्हावे आदी १७ मागण्यांसाठी चव्हाण याने हे आंदोलन केले.
याआधीच्या घटना...
याआधी गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात पॅरोलवर बाहेर असलेल्या हर्षल रावते या व्यक्तीने मंत्रालयात उडी मारून आत्महत्या केली होती. खान्देशातील धर्मा पाटील या वयोवृद्ध शेतकऱ्यानेही मंत्रालयातच विष पिऊन आत्महत्या केली होती. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयाच्या मधल्या भागात दुसऱ्या मजल्यावर संरक्षक जाळी बसविण्यात आली.