अ‍ॅपशहर

कॉपीमुक्त कोकण, कॉपीबहाद्दर औरंगाबाद

दहावीच्या परीक्षेत पेपरफुटी होऊ नये, तसेच परीक्षा कॉपीमुक्त व्हावी या उद्देशाने राज्य शिक्षण मंडळाने यंदा नियम अधिक कडक केले होते. तरीही मंडळावर पेपरफुटीची नामुष्की ओढावली. यंदा राज्यभरात कॉपीची ४९० प्रकरणे उघड झाली आहेत. मात्र, सर्व विभागांपैकी कोकण विभागात यंदा कॉपीचे एकही प्रकरण समोर आले नसून, त्याबद्दल शैक्षणिक वर्तुळात या विभागाचे कौतुक केले जात आहे.

Maharashtra Times 26 Mar 2018, 6:41 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम exam


दहावीच्या परीक्षेत पेपरफुटी होऊ नये, तसेच परीक्षा कॉपीमुक्त व्हावी या उद्देशाने राज्य शिक्षण मंडळाने यंदा नियम अधिक कडक केले होते. तरीही मंडळावर पेपरफुटीची नामुष्की ओढावली. यंदा राज्यभरात कॉपीची ४९० प्रकरणे उघड झाली आहेत. मात्र, सर्व विभागांपैकी कोकण विभागात यंदा कॉपीचे एकही प्रकरण समोर आले नसून, त्याबद्दल शैक्षणिक वर्तुळात या विभागाचे कौतुक केले जात आहे.

राज्यातील नऊ विभागांमध्ये सुरू असलेली दहावीची परीक्षा शनिवारी संपली. कॉपीमुक्त परीक्षा व्हावी या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासन विविध स्तरावर प्रयत्न करत आहे. असे असतानाही राज्यातील कॉपीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. यावर्षी कॉपीची सर्वाधिक १२१ प्रकरणे औरंगाबाद विभागात समोर आली आहेत. सर्वाधिक कॉपी ही इंग्रजी, गणित आणि विज्ञानाच्या पेपरांदरम्यान झाल्याचे मंडळाने दिलेल्या आकडेवारीवरून समोर येते. विज्ञानाच्या पेपराच्या दिवशी राज्यभरातून १०६ कॉपी प्रकरणे समोर आली. इंग्रजी पेपराच्या दिवशी ९७ कॉपी प्रकरणे पकडण्यात आली. बीजगणितच्या पेपरच्या दिवशी ७१, तर भूमितीच्या पेपरच्या दिवशी ७२ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना आता मंडळाच्या चौकशी समितीसमोर बोलावले जाणार आहे. तेथे त्यांनी स्वत:ला निर्दोष असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध केले तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. अन्यथा त्यांना त्यांच्या कॉपीच्या प्रकारानुसार एक ते तीन वर्षांपर्यंतची परीक्षाबंदीची शिक्षा भोगावी लागणार आहे.

इंग्रजीतील कॉपी चिंताजनक

यावर्षी प्रथमच इंग्रजीच्या पेपरदरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉपी झाल्याचे उघड झाले आहे. इंग्रजीचा पेपर यंदा खूप सोपा होता. त्यामध्ये उताऱ्यावरून प्रश्न लिहायचे होते. असे असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी कॉपी करत असतील तर ही चिंताजनक बाब असल्याचे शिक्षण क्षेत्रात बोलले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या या मानसिकतेचा अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोकण विभागातील विद्यार्थ्यांची शिस्त आणि प्रामाणिकपणा कॉपीमुक्त अभियानाच्या यशाचे मुख्य कारण ठरले आहे. बारावीत दोन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र, कॉपी करणे चुकीचे असल्याचे दहावीच्या विद्यार्थ्यांना पटवून देण्यात कोकणातील शिक्षक आणि पालक यशस्वी झालेत. तसेच, परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी भरारी पथकेही सतर्क होती.

- आर. बी. गिरी, कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष

विभागवार कॉपीची प्रकरणे

विभाग कारवाई झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या

औरंगाबाद १२१

अमरावती ९४

नाशिक ६२

लातूर ५०

कोल्हापूर ४७

नागपूर ४५

मुंबई ३७

पुणे ३४

कोकण ००

एकूण ४९०

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज