म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
'शेतकऱ्यांना २५ हजार रुपये मिळेना…...' असे प्रत्युत्तर देत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'विश्वासघाती सरकार' असा आरोप मुख्यमंत्र्यांवर लावला.
शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये देण्याची घोषणा केली असताना भाषणात एक हजार रुपयांचादेखील उल्लेख होऊ नये, हे अतिशय दुर्दैवी आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील मुख्यमंत्र्यांच्या उत्तरातील भाषणात राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांचा नामोल्लेख झाला नाही. विदर्भात अधिवेशन होत असताना विदर्भाबाबत अवाक्षरही काढले नाही. केवळ खुर्ची वाचवण्यासाठी कवायत चालली आहे. दोन पक्षांची खुशमस्करी करून त्यांना खूश ठेवणे एवढीच कला आत्मसात केल्याचे दिसून येते, असा हल्ला मुख्यमंत्र्यांवर चढवला. सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर मुख्यमंत्र्यांकडून उत्तर अपेक्षित होते. मात्र, तसे काहीच झाले नाही. ही पूर्णपणे बेईमानी असून शेतकऱ्यांसाठी आजचा काळा दिवस आहे, अशी खंतही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.