अ‍ॅपशहर

दक्षिण-पश्चिमचे १५७ कोटी थांबले

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील विविध योजना रद्द करणे, स्थगिती देणे असे प्रकार झाल्याचे बोलले गेले. आता त्यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील तब्बल १५७ कोटी रुपये थांबविण्यात आल्याने कामे ठप्प झाली आहेत.

Authored byनितीन तोटेवार | महाराष्ट्र टाइम्स 31 Oct 2020, 2:43 pm
नागपूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील विविध योजना रद्द करणे, स्थगिती देणे असे प्रकार झाल्याचे बोलले गेले. आता त्यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील तब्बल १५७ कोटी रुपये थांबविण्यात आल्याने कामे ठप्प झाली आहेत. निधीअभावी प्रशासन व कंत्राटदारांची चिंता वाढली असून, फडणवीसांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 157 crore rupees of work has been stopped in the south western constituency in nagpur
दक्षिण-पश्चिमचे १५७ कोटी थांबले


फडणवीस सरकारच्या काळात महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास योजनेंतर्गत एकूण ८७ कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, नगरविकास विभागाने गेल्यावर्षी २ सप्टेंबर रोजी १५७ कोटी ५० लाख रुपये मंजूर केले. यातील ८५ कामांच्या निविदा व कार्यादेश झाल्यानंतर २४ कामे पूर्ण झाली. यावर ६ कोटी १७ लाख ५४ हजार कोटी रुपये खर्च झाले. २२ कामे अपूर्ण आहेत. सुमारे ३१ कोटी १६ लाख रुपयांची कामे झाली. या कामांसाठी ८६ कोटी ८५ लाख रुपये अपेक्षित आहेत. निधीअभावी ८५पैकी ३९ कामे कंत्राटदारांनी सुरूच केलेली नाहीत.

वीर सावरकर चौक अर्थात ऑरेंजसिटी हॉस्पिटल ते सोनेगावपर्यंतचा सिमेंट काँक्रिटचा रस्ता निधीअभावी अपूर्णावस्थेत आहे. सुमारे साडेतेरा कोटी रुपयांचा हा मार्ग आहे. मनीषनगर रेल्वे क्रॉसिंग ते बेलतरोडी रोड टी पॉइंट, मनीषनगर ओव्हरब्रिज ते बेलतरोडीकडे जाणारा मार्ग, श्यामनगर पूल ते मिहान बॉउंड्रीपर्यंत २४ मीटर डीपी रोड सिमेंट (खडीकरणाचे काम झाले), बालाजीनगर रस्ता, बेलतरोडी रोड ते वैद्य कॉन्व्हेंटपर्यंत १८ मीटर रुंद रस्त्याचे काम कंत्राटदाराने बंद केले. मतदारसंघातील लहान-मोठी थांबवलेली कामे, खोदकाम केलेले व अपूर्ण रस्ते यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मध्यंतरी पक्षाच्यावतीने विकास निधी थांबवल्याबद्दल सर्वत्र आंदोलने करण्यात आली. मात्र, त्याचा लाभ झाला नाही.

आयुक्तांचे पत्र बेदखल

सद्यस्थितीत पूर्ण झालेली व अपूर्ण कामांसाठी ९३ कोटी ९६ लाख रुपयांची गरज आहे. लोकांना त्रास होऊ नये म्हणून कंत्राटदारांसाठी १३ कोटी रुपये तर इतर कामांसाठी २ कोटी असे १५ कोटी रुपये मिळवण्यासाठी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सरकारला २ मार्च व २७ जुलै रोजी दोन पत्रे पाठवली. मात्र, अद्याप त्याची दखल घेतली गेलेली नाही.

३२ कोटींसाठी प्रयत्न

महापालिकेकडे कमी दरातील निविदा, तांत्रिक अडचणींमुळे थांबलेल्या अन्य कामांचे ३०-३२ कोटी रुपये आहेत. समायोजन तत्त्वावर हा निधी दिल्यास कामे मार्गी लागतील. दिवाळीत कंत्राटदारांचे देणी देता येतील. तसेच, अपूर्ण कामे पूर्ण होतील, यासाठी आता प्रयत्न चालले आहेत. यातील निधी मिळाल्यास कामे मार्गी लागू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज