विदर्भातील सर्व ६२ जागा लढणार; खाते उघडण्याचा केला दावा
म.टा.विशेष प्रतिनिधी,नागपूर
बहुजन समाज पार्टीने राज्यात २६४ उमेदवार स्वबळावर उभे केले आहेत. यात विदर्भातील सर्व ६२ जागांवर पक्षाने उमेदवार दिले असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे उत्तर नागपुरातून रिंगणात आहेत. यावेळी बसपा आपले खाते उघडेल, असा दावा पक्षाचे प्रदेश प्रभारी, राष्ट्रीय महासचिव आणि राज्यसभेचे खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केला.
पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांची सोमवार, १४ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता इंदोरा मैदान येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
बसपाने निवडणुकीसाठी कुठलाही वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. बसपाचा भारतीय संविधानावर विश्वास असून, त्याची संपूर्ण अंमलबजावणी करणे, हाच बसपाचा निवडणूक जाहीरनामा होय, असे खासदार सिद्धार्थ म्हणाले. प्रस्थापित सरकार हे जनविरोधी व मनुवादी असल्याने त्यांना व त्यांच्याच धोरणांवर चालणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसलाही सत्तेपासून दूर ठेवून बसपाला 'बॅलेन्स ऑफ पॉवर' बनविणे हेच पक्षाचे ध्येय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पक्षाने निवडणुकीपूर्वी वंचित आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली. पक्षाचे महासचिव व प्रभारी रामअचल राजभर यांनी पुढाकार घेत त्यांची भेटही घेतली. परंतु, 'किती जागा द्यायच्या, हे ठरवू', असे सांगत त्यांनी निवडणूक जाहीर होईपर्यंत टाळाटाळ केली, असे डॉ. सिद्धार्थ यांनी सांगितले. महागाई, शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार यांसारखे प्रश्न युती सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात जनतेसमोर निर्माण झाले. या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून बसपा मतदारांपर्यंत मतांचा जोगवा मागेल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष व उत्तर नागपूरचे उमेदवार सुरेश साखरे, उपाध्यक्ष कृष्णा बेले, मंगेश ठाकरे, जितेंद्र म्हैसकर, उत्तम शेवडे, जितेंद्र घोडेस्वार, महेश सहारे, विलास सोमकुंवर आदी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना प्राधान्य
यंदाच्या निवडणुकीत पक्षाने अनेक ठिकाणी चांगले उमेदवार दिले आहेत. पूर्व विदर्भ, जालना व इतरही भागांत विजय मिळविणारे उमेदवार असल्याने बसपाचा हत्ती विधिमंडळात प्रवेश करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षाने यावेळी कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली. यापूर्वी गरज व परिस्थितीनुसार उमेदवारी देण्यात आली. परंतु, कार्यकर्तेच पक्ष वाढवून जनतेपर्यंत पोहोचत असल्याने कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यात आल्याची माहिती खासदार सिद्धार्थ यांनी दिली.