म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ
९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे वेगळेपण जपण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत ५२ कवींची व्यक्तिचित्रे काढली जात आहेत. सोबतच त्यांच्या कवितांही पोस्टरवर साकारल्या जात आहेत. या कामासाठी यवतमाळ जिल्ह्यातील कलावंतांना आमंत्रित करण्यात आले होते. पण, बाहेरगावावरून येणे-जाणे शक्य नसल्याने यवतमाळ शहरातील संजय सांमजवार, रणजित वनकर आणि रवींद्र क्षीरसागर या कलावंतांनी ही जबाबदारी उचलली. यासंबंधीचे अर्धेअधिक काम झाले आहे. संमेलनात ५२ निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. याशिवाय वऱ्हाडी बोली कविसंमेलनात २२ कवी राहणार असून १६ मान्यवर कवींचे काव्यवाचन होणार आहे.