म. टा. वृत्तसेवा, गोंदिया
राज्यात आरोग्य सेवेतील जवळपास ६६ टक्के वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांवर ताण येत आहे. या रिक्त जागांवर मॉडर्न मेडिसीन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. महाराष्ट्र सर्व शाखीय होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनचे डॉ. संजय देशमुख यांनी यासंदर्भात राज्य सरकारला निवेदन दिले आहे.
डॉ. देशमुख यांनी आपल्या निवेदनात राज्यात जवळपास ८० हजारांपेक्षा जास्त होमिओपॅथी डॉक्टर आहेत. विविध जिल्ह्यांत प्रॅक्टिस करीत आहेत. त्यांनी बीएचएमएस उत्तीर्ण करून राज्य शासनाची आधुनिक वैद्यकीय शास्त्राची पदवीदेखील घेतली. राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवा खिळखिळी झाली आहे. एमबीबीएस अधिकारी ग्रामीण भागात काम करीत नाही. बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी एक वर्ष सेवा देऊन राजीनामा देतात. ९० टक्के शासकीय रुग्णालयांत बीएएमएस झालेले डॉक्टर सेवा देत आहेत. बीएएमएस पदवीधारकांच्या अभ्यासक्रमात आधुनिक औषधशास्त्र हा अभ्यासक्रम नसूनदेखील त्यांना सेवेत घेण्यात येत आहे. आरोग्य सेवा बळकट करण्याकरिता होमिओपॅथी डॉक्टरांना सेवेत घेण्यात यावे, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्रव्यवहार केला आहे.