म. टा. प्रतिनिधी, नागपूर
करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँक खातेधारकांना मोठा दिलासा देत शुक्रवारी काही उपाययोजना जाहीर केल्या. तीन महिन्यांसाठी कर्जाचे हफ्ते स्थगित ठेवण्याची मुभा सर्वच वित्तीय संस्थांना देण्याचा निर्णय घेतल्याने कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. संकटाच्या या काळात सरकारही उद्योग व व्यवसाय क्षेत्रासाठी सकारात्मक उपाययोजना करीत आहे, ही हमी प्रत्येकाला यामुळे मिळणार असल्याची प्रतिक्रिया उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या आहे.
सध्या करोनाच्या संकटापासून अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेच्या वतीने काही उपाययोजना करण्यात आल्या असून, ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी करत वाहन व गृह कर्जांवरील व्याज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कर्जदात्यांच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे, पतपुरवठा करणाऱ्या सर्व वित्तीय संस्थांना त्यांना कर्जाचे हफ्ते पुढील तीन महिन्यांपर्यंत स्थगित करण्याची मुभा दिली आहे. त्याचबरोबर व्याजावर कुठल्याही प्रकारचा दंड आकारण्यात येऊ नये, असेही म्हटले आहे. ही अत्यंत चांगली बाब असली तरी उद्योगांसाठी पुढील तीन महिन्यांसाठी रेपो रेट इतकेच व्याज दर कमी करण्याची आवश्यकता होती. एकीकडे आधीच उद्योग अडचणीत आहेत. आर्थिक वर्ष संपत असताना हे संकट ओढवल्याने अनेक उद्योग त्यांच्या ऑर्डर्स पूर्ण करून ठेवण्यासाठी प्रयत्नरत आहेत. या स्थितीत करोनामुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने उद्योगांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, रिझर्व्ह बँकेने रेपो रेटच्या दरात पुढील तीन महिन्यांसाठी उद्योगांकडून कर्जावर व्याज आकारायला हवे होते, अशी अपेक्षा बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष नितीन लोणकर यांनी व्यक्त केली. अर्थव्यवस्था व सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेने घेतलेले निर्णय स्वागतार्ह असले तरी उद्योगांसाठी अजून काही उपाययोजनांची अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या करोनामुळे अर्थव्यवस्था अडचणीत असताना रिझर्व्ह बँकेने केलेल्या उपाययोजना स्वागतार्ह आहेत. मात्र, या स्थितीनंतर निर्माण होणाऱ्या मंदीतून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करणेही अत्यंत आवश्यक आहेत. रिझर्व्ह बँकेचा कर्जाच्या हफ्त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. त्यामुळे बँकांनी रिझर्व्ह बँकेने केलेल्या या उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी कॉन्फीडरेशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज ॲण्ड ट्रेडने (सीएएमआयटी) केली आहे.
रिझर्व्ह बँकेने केलेल्या उपाययोजनांमुळे संकटाच्या या काळात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. सध्या सर्वच क्षेत्र ठप्प असले तरी आपल्याही क्षेत्राचा सरकारने विचार केला आहे, याचा सकारात्मक परिणाम किंवा एक आश्वस्त करणारे वातावरण नक्कीच निर्माण होईल, अशी आशा करायला हरकत नाही, अशी प्रतिक्रिया 'क्रेडाई'चे माजी अध्यक्ष प्रशांत सरोदे यांनी व्यक्त केली आहे.
........