म. टा. वृत्तसेवा, बुलडाणा
विदर्भासह बुलडाणा जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. माणसांसोबतच वन्यजीवांनाही जणगे कठीण होऊन बसले आहे. सरकारची उदासीनता आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे फडणवीस सरकार दुष्काळाचा सामना करण्यास पूर्णत: अपयशी ठरले आहे. याविरोधात काँग्रेस तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्रÑ प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विदर्भातील दुष्काळाची पाहणी करण्याकरीता समित्या गठित केल्या. बुलडाणा जिल्ह्याच्या समितीने सोमवारी विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यामध्ये माजी मंत्री वसंतराव पुरके, आ. रणजित कांबळे, वीरेंद्र जगताप, हर्षवर्धन सपकाळ, प्रवक्ते अतुल लोढे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात फक्त दोन टक्के पीककर्जाचे वाटप झाले आहे. जिल्ह्यात मोठ्या व मध्यम प्रकल्पामध्ये चार टक्के जलसाठा शिल्लक असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले. समस्यांचा पाढा वाचतानाच आ. बोंद्रे यांनी १५ मे रोजी प्रत्येक तहसीलसमोर घागर फोडो आंदोलन, १७ मे रोजी तालुकास्तरावर बँकेसमोर ठिय्या आंदोलन आणि २० मे रोजी बैलगाडी मोर्चा व रास्तारोको करण्यात येणार असल्याची माहिती दिली.