म.टा. प्रतिनिधी, नागपूर
करोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने विविध बँकांतील खातेधारकांना दिलासा देत काही घोषणा केल्या. तीन महिन्यांसाठी कर्जाचे हफ्ते स्थगित ठेवण्याची मुभा सर्वच वित्तीय संस्थांना देण्याचा निर्णय घेतल्याने कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संकटाच्या काळात सरकारही उद्योग व व्यवसाय क्षेत्रासाठी सकारात्मक उपाय करण्यात येत असल्याची हमी प्रत्येकाला त्यामुळे मिळाल्याची प्रतिक्रिया उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. करोनाच्या संकटापासून अर्थव्यवस्थेला वाचविण्यासाठी केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेच्यावतीने काही उपाय करण्यात येत आहेत. ही बात समाधानकारक आहे. रिझर्व्ह बँकेने रेपोरेट कमी करत वाहन व गृह कर्जावरील व्याज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जदात्यांच्या दृष्टीने सर्वाधिक महत्वाची बाब म्हणजे पतपुरवठा करणाऱ्या सर्व वित्तीय संस्थांना त्यांना कर्जाचे हफ्ते पुढील तीन महिन्यांपर्यंत स्थगित करण्याची मुभा दिली आहे. व्याजावर कुठल्याही प्रकारच दंड आकारण्यात येऊ नये असेही म्हटले आहे. ही चांगली बाब असली, तरी उद्योगांसाठी पुढील तीन महिन्यांसाठी रेपोरेट इतकेच व्याजदर कमी करण्याची गरज होती. एकीकडे आधीच उद्योग अडचणीत आहेत. आर्थिक वर्ष संपत असताना हे संकट ओढवल्याने अनेक उद्योगांनी त्यांच्या ऑर्डर्स पूर्ण करून ठेवण्यासाठी प्रयत्नरत आहेत. या स्थितीत करोनामुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने उद्योगांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने रेपोरेटच्या दरात पुढील तीन महिन्यांसाठी उद्योगांकडून कर्जावर व्याज आकारायला हवे होते अशी अपेक्षा बुटीबोरी मॅन्युफॅक्चरींग असोसिएशनचे माजी अध्यक्ष नितीन लोणकर यांनी व्यक्त केली. अर्थव्यवस्था व सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेने घेतलेले निर्णय स्वागतार्ह असले तरी उद्योगांसाठी अजून काही उपाययोजनांची अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या अर्थव्यवस्था अडचणीत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने केलेल्या उपाययोजना अत्यंत स्वागतार्ह आहेत. मात्र या स्थितीनंतर निर्माण होणाऱ्या मंदीतून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहेत. रिझर्व्ह बँकेने कर्जाच्या हफ्त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे बँकांनी रिझर्व्ह बँकेने केलेल्या या उपायांची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी कॉन्फीडरेशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज ॲन्ड ट्रेडने (सीएएमआयटी) केली आहे.
रिझर्व्ह बँकेने केलेल्या उपायांमुळे संकटाच्या काळात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. आरबीआयने अनेक घोषणांचा सध्या सर्वच क्षेत्र ठप्प असले तरी आपल्याही क्षेत्राचा सरकारने विचार केला आहे, याचा सकारात्मक परिणाम किंवा एक आश्वस्त करणारे वातावरण नक्कीच निर्माण होईल अशी आशा करायला हरकत नाही, अशी प्रतिक्रिया क्रेडाईचे माजी अध्यक्ष प्रशांत सरोदे यांनी व्यक्त केली आहे.