निदर्शनांतून दाखविला रोष
म.टा.प्रतिनिधी, नागपूर
नागपूर जिल्हा प्रशासनाच्या लोकसभा निवडणुकीतील ढिसाळ नियोजनाविरोधात शिक्षक एकवटले आहेत. निवडणुकीचे काम आटोपून परत येताना अपघाती मृत्यू झालेल्या शिक्षकांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. याशिवाय, निवडणुकीच्या कामातील कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाने विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, याबाबतचा आग्रहदेखील जोर धरू लागला आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावरील निवडणुकीचे काम आटोपून परत येताना पुंडलिक बाहे आणि नुकेश मेंढुले या शिक्षकांचा मृत्यू झाला. नरेंद्र पिपरे आणि विजय बहुरूपी हे गंभीर जखमी झाले आहेत. नागपूर ते उमरेड मार्गावरील चांपा परिसरात हा अपघात घडला होता. सलग ४८ तास काम केल्यानंतर घरी परतत असताना झाडावर कार आदळून हा अपघात झाला होता. नुकेश मेंढुले हे उमरेड येथील अशोक विद्यालय येथे तर पुंडलिक बाहे कुही येथील प्राचार्य दामोदरराव खापर्डे विद्यालयात कार्यरत होते. मेंढुले हे २००५नंतर सेवेत रुजू झाले होते. त्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू झाली नव्हती. अकाली मृत्युमुळे त्यांच्या परिवाराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या शिक्षकांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे, यासाठी सोमवारी नागपुरात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी निवडणुकीच्या कामात ढिसाळ नियोजन होत असल्याची टीका आंदोलक शिक्षकांनी केली. या निदर्शनांमध्ये नागपूर विभाग अध्यक्ष आशुतोष चौधरी, शहराध्यक्ष गजानन टांगले, शिवराम घोती यांच्यासह इतर शिक्षक सहभागी झाले होते.
मागण्या अशा...
-मृत शिक्षकांना सानुग्रह रक्कम देण्यात यावी.
-शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांना ते ज्या तालुक्यात आहेत, त्याच तालुक्यात निवडणुकीचे काम देण्यात यावे.
-महिला शिक्षिकांना निवडणुकीची वेळ संपल्यानंतर लगेच कार्यमुक्त करण्यात यावे.
-निवडणुकीच्या कामातून परत घरी परतणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.
-निवडणूक कर्तव्यात सहभागी असणाऱ्या शिक्षक आणि कर्मचारी यांना दुसऱ्या दिवशी सुटी जाहीर करण्यात यावी.