\Bवडेट्टीवार यांची शंका; वाटचाल वाटतेय संशयास्पद!\B
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
'महाआघाडीबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर गंभीर नाहीत. भाजपला लाभ पोहोचवण्याची त्यांची भूमिका यातून दिसते', अशी शंका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केली.
विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर वडेट्टीवार यांचे गुरुवारी पहिल्यांदाच उपराजधानीत आगमन झाले. दीक्षाभूमी येथे दर्शन घेऊन त्यांनी सिंचन, महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
'प्रकाश आंबेडकर यांना आघाडी करायची नाही. एखाद्याने काही करायचेच नाही ठरवले तर त्यास उपाय नाही आणि कुणी काही करण्याचा निश्चय केल्यास त्यांना रोखू शकत नाही. त्यांची भूमिका निश्चित असल्याचे दिसून येते. भाजपला लाभ पोहोचावा, असे त्यांच्या वाटचालीवरून लक्षात येते. भाजपची 'बी टीम' नाही तरी, 'ए'पासून 'एफ'पर्यंत नक्कीच कोणती तरी टीम असल्याचा संदेश समाजात जात आहे', असा दावा त्यांनी केला. मतविभाजन टाळण्यासाठी अॅड. आंबेडकरांनी सोबत यावे, असे आमचे प्रयत्न राहतील. लोकसभा निवडणुकीत त्यांना सहा टक्के मते मिळाली तर, आम्हाला १५ टक्क्यांहून अधिक मते मिळाली. यानंतरही आम्हाला ४० जागा देत असल्याचे अॅड. आंबेडकरांनी जाहीर केले. आघाडीच्या चर्चेत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वेगळ्या विदर्भाकडे लक्ष वेधले असता, 'हा आमचा मुद्दा नव्हता. अॅफिडेव्हिट देणाऱ्या नेत्यांना हा प्रश्न विचारा', असे वडेट्टीवार म्हणाले. राहुल गांधी यांनी भाजप व संघाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. पक्षाचे नेतृत्व त्यांनी करावे, अशी सर्व कार्यकर्त्यांची भावना असल्याचे ते म्हणाले.
पत्रपरिषदेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, किशोर गजभिये, नामदेव उसेंडी, एस. क्यू. झमा, उमाकांत अग्निहोत्री आदी उपस्थित होते.
घोटाळ्यांबाबत सरकारची
बोंबाबोंब : वडेट्टीवार
सिंचनाच्या कामातील घोटाळ्याबाबत बोंबाबोंब करणाऱ्या सरकारकडे पुरावे होते तर चौकशीसाठी इतका वेळ का लागत आहे, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. राज्यकर्त्यांनी फक्त बोंब ठोकली, निघाले काहीच नाही. चौकशीत जे व्हायचे ते होईल पण, उशीर का लावला, असा सवाल त्यांनी केला. सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. हे ऑडिट केवळ कागदावर न होता प्रत्यक्ष होईल याची काळजी सरकारने घ्यावी. विदर्भातील सिंचन क्षेत्रात एक टक्काही वाढ झालेली नाही. गेल्या पाच वर्षांत एकही नवीन काम सुरू केले नाही आणि निविदा सहा महिन्यांपूर्वी काढल्या. सिंचनाची वस्तुस्थिती लपवण्यात येत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
शेतकरी वंचित!
राज्यातील ३० लाख शेतकरी पात्र असून त्यांना अद्याप कर्ज मिळालेले नाही. सरकारने २४ लाख शेतकऱ्यांना कर्ज दिल्याचा दावा केला. सरकारने शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, सात-बारा कोरा करावा, या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
भ्रष्टाचाराविरुद्ध लढणार!
फडणवीस सरकारने पोकळ आश्वासने दिली. बोलघेवडे सरकार आहे. सीबीआय, ईडीचा धाक दाखवून विरोधकांचा आवाज दाबण्यात येत आहे. ५० कोटी रुपयांच्या मोबाईल घोटाळ्यासह १६ मंत्र्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचे पुरावे दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली. येत्या निवडणुकीत हा मुद्दा अधिक प्रकर्षाने मांडण्यात येईल, असा इशारा देऊन विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्याकडे मशीन असल्यास काय करणार, असा उलट सवाल केला. नागपूरच्या महामेट्रोत दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. सबळ पुराव्यांसह हा घोटाळा लवकरच चव्हाट्यावर आणण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.