एक संस्कृत श्लोक सांगतो, की जेव्हा तुमचा जन्म झाला, तुम्ही रडत होता तेव्हा जग हसत होते. जीवन असे जगा, की मृत्यू आल्यास तुमच्या चेहऱ्यावर हसू असले पाहिजे व जग रडले पाहिजे. थोडक्यात ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे.’ डॉ. कृष्णा कांबळे हे याचे जिवंत उदाहरण. नागपूर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात डॉ. कांबळे हे प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ आहेत. मागील महिन्यात त्यांच्या पत्नीचा देहांत झाला. त्यांनी दु:ख बाजूला सारून पत्नीचा देह वैद्यकीय महाविद्यालयाला दान केला. अवयवदानाविषयी केवळ लोकांना सांगत न बसता स्वत:पासून त्याची सुरुवात केली. एक आदर्श प्रस्थापित केला.
आज जागरूकतेमुळे लोक मोठ्या प्रमाणात देहदानासाठी समोर येताना दिसत आहेत. देहदानाएवढाच किंवा त्याहीपेक्षा महत्त्वाचा विषय म्हणजे अवयवदानाचा. सोशल मीडिया व इतर माध्यमांद्वारे अवयवदानाविषयी प्रचार व प्रसार होत असल्याचे दिसते. अवयवदानासंबंधात काही लोक मोलाचे कामही करीत आहेत. नागपुरातील रमेश सातपुते हे त्यातलेच एक उदाहरण. ‘छंदवैभव’ या वेगवेगळ्या वस्तूंचे संग्रह करणाऱ्या लोकांच्या संघटनेच्या माध्यमातून सातपुते यांच्याशी माझी ओळख झाली. सातपुते आज अनेक क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांचे अतिशय मोलाचे कार्य म्हणजे देहदानाबद्दल जनतेमध्ये प्रचार व प्रसार करून जागरूकता आणणे. देहदान करणाऱ्या व्यक्तीच्या घरातील सर्व सदस्यांना माहिती देणे, त्यांच्या शंकेचे निरसन करणे, फॉर्म भरून घेणे व मृत्यूनंतर ठराविक वेळेत देह वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी सोपविण्यापर्यंतची सर्व कामे सातपुते एकटे पार पाडतात. हे कार्य ते मागील अनेक वर्षांपासून सातत्याने करीत आहेत.
डॉ. रवी वानखडे हेदेखील मोहन फाउंडेशनच्या माध्यमातून काम करीत असून त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. डॉ. वानखडे यांनी स्वतः आपल्या मित्राला किडनी देऊन या कामाची सुरुवात केली आहे. चंद्रपूर येथे आयोजित केलेल्या मोहन फाउंडेशनच्या कार्यक्रमात मला अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला. या कार्यक्रमात उपस्थित लोकांना अवयवदानाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. माहिती इतकी प्रभावीपणे दिली की कार्यक्रमाच्या शेवटी दोनशेच्यावर लोकांनी अवयवदानासाठी लेखी सहमती दिली. आपल्या देशात अवयवांची गरज असलेल्या रुग्णांच्या तुलनेत अवयव दान करणाऱ्या दात्यांची संख्या नगण्य असल्याची बाब या कार्यक्रमातील माहितीदरम्यान स्पष्ट झाली. याचाच अर्थ अवयवदानाच्या क्षेत्रात अजून खूप मोठे काम होणे बाकी आहे. त्यासाठी हजारो डॉ. रवी वानखडे तयार करण्याची गरज आहे.
मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या किडनी ट्रान्सप्लान्ट कमिटीचा सदस्य आहे. डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या प्रयत्नातून आतापर्यंत या कमिटीद्वारे जवळपास २० गरीब रुग्णांना किडनी दान व मोफत ट्रान्सप्लान्ट करून जीवनदान देण्यात आल्याचे एक मोठ काम ज्ञात आहे. मुळात आज एखाद्याला किडनी हवी असल्यास दाते म्हणून आई किंवा पत्नी समोर येते. पण, नातेवाइकच का हा प्रश्न इथे कायम राहतो. समाजातील सर्व घटकांनी यासाठी प्रयत्न केल्यास एक मोठा बदल घडून येणे शक्य आहे. ब्रेन डेड झालेल्या रुग्णांचे हृदय, किडनी, डोळे, त्वचा, लिव्हर व इतर अनेक अवयव गरजू रुग्णांच्या कामी येऊ शकते. म्हणून अवयवदान केल्यास अनेकांना जीवनदान देणे शक्य आहे. मृत्यूपत्रात लिहून ठेवलेल्या संपत्तीच्या वाटणीतून अनेक परिवार तुटलेले पाहिले आहेत. संपत्ती देणाऱ्याचे नाव त्यानंतर घेतले जात नसल्याचीही उदाहरणे आहेत. मात्र अवयवदानातून दिलेल्या जीवनदानामुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीत त्या अवयवाच्या माध्यमातून जिवंत राहू शकता. लोकांचे दिशादर्शक होऊन सदैव लोकांच्या स्मरणात राहू शकता. मरावे परी दुसऱ्याच्या शरीरी अवयवरूपी उरावे!