म.टा.विशेष प्रतिनिधी,नागपूर
महापौर नंदा जिचकार यांचा कार्यकाळ नवरात्रीनंतर संपुष्टात येणार असल्याचे संकेत भाजपच्या नेत्यांनी दिले. 'भाजपमध्ये बदल सहज होत असतात', असे सांगत शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी, 'निर्णय कधीही होऊ शकतो', असे सूचित केले.
'मटा'मध्ये शुक्रवारच्या अंकात प्रकाशित 'महापौर बदलणार!' या वृत्ताने मनपात चर्चांचे पेव फुटले. मुलाला पीए बनवून विदेश दौरा केल्यामुळे महापौर अडचणीत आल्या होत्या. माध्यमांनी टीकेची झोड उठवली होती, विरोधकांनी निदर्शने केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांनीही महापौर बदलण्याचा निर्णय घेतला. पण, विरोधकांना श्रेय मिळू नये म्हणून अंमलबजावणी लांबविण्यात आली. ११ ऑक्टोबर रोजी महापौरांचा राजीनामा घेतला जाईल, अशी जोरदार चर्चा भाजपच्या वर्तुळात होती. मात्र, तसे घडले नाही. धम्मचक्र प्रवर्तनदिनाचा कार्यक्रम, संघाचा विजयादशमी उत्सव आणि महापौर परिषद हे कार्यक्रम झाल्यावर निर्णय अंमलात आणला जाणार असल्याचे भाजप नेते खासगीत सांगत आहेत.
भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार कोहळे यांनी महापौर बदलावर गोलमोल उत्तर देत टाळण्याचा प्रयत्न केला. भाजपमध्ये बदल हे सहज होतात. शिवाय, दोन बॉस असल्याने असा निर्णय घेणे सुलभ होते, असेही ते म्हणाले. ''बॉस'ऐवजी नेते म्हणा', अशी दुरुस्तीही त्यांनी लगेच केली. मनपात प्रचंड आर्थिक आणीबाणी असून, रोज आंदोलने होत आहेत. यावर येत्या आठ ते दहा दिवसांत मार्ग निघेल, अशी ग्वाही कोहळे यांनी दिली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी संयम ठेवावा, असे आवाहनही केले. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी भेट झाली असून, हा प्रश्न सुटेल, असा दावाही त्यांनी केला. मधल्या काळात सार्वजनिक बांधकाम विभाग झोपलेला होता. आता भरपूर काम आहे. त्यामुळे अपेक्षित गती येण्यास वेळ लागत आहे. शहरात मोठे काम सुरू असल्याने असे होते, अशी भूमिकाही कोहळे यांनी मांडली.
शहरावर पाणीसंकट
आगामी काळात शहरावर मोठे पाणीसंकट येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वागत पाणीबचत करावा, असे आवाहन कोहळे यांनी केले. पालकमंत्री व आमदार हे पिण्याच्या पाण्यासाठी बैठकी घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी आग्रह धरत आहेत. पेंचमध्ये पाणीपातळी कमी आहे. चौराई धरणातील पाणी पेंचमध्ये आले तरच पाणीसंकटावर मात करता येईल. पिण्याचे पाणी ही अग्रक्रमावर असल्याने भूजल पातळी, विंधनविहीरी व नियोजन यांचा योग्य तो ताळमेळ साधणे अत्यंत गरजेचे असल्याकडेही कोहळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात लक्ष वेधले.
आमदारांचे रिपोर्ट कार्ड 'बेस्ट न् बेस्ट' : कोहळेंचा दावा
शहराध्यक्ष कोहळे यांच्यासह भाजपच्या तीन आमदारांसाठी 'रिपोर्ट कार्ड'ने धोक्याची घंटा वाजविली असल्याकडे लक्ष वेधल्यावर खुद्द आपणच 'बेस्ट न् बेस्ट' असल्याचा शेरा कोहळे यांनी नोंदविला. इतर आमदारांचे रिपोर्ट कार्डही बेस्टच आहेत. बंद लिफाफ्यात हे रिपोर्ट दिले जातात. त्यामुळे ते कुणालाच माहिती होत नाहीत. माध्यमांना ते कसे कळाले, याबाबत आश्चर्यच आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 'सततच्या बैठकींमुळे नगरसेवक, कार्यकर्ते संतापले का', या प्रश्नाववर त्यांनी 'बैठकी हा चिंतनाचा भाग आहे', असे सांगत यातून संवाद साधला जात असल्याचे नमूद केले.