अ‍ॅपशहर

नागपूरचा प्रकल्पही गुजरातला! 'एअरबस-टाटा'ची रविवारी बडोद्यात पायाभरणी; वैदर्भीयांमध्ये नाराजी

राज्य सरकारच्या अनास्थेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटून गुजरातकडे गेला, असे त्यांचे म्हणणे आहे. तर, हा प्रकल्प गुजरातमध्ये होईल, हे वर्षभरापूर्वीच ठरलेले होते व विरोधक यावर विनाकारण राजकारण करीत आहेत, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी रात्री काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना नमूद केले.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 28 Oct 2022, 7:55 am
नागपूर : भारतीय हवाई दलासाठी मालवाहू विमाने तयार करण्याचा तब्बल २२ हजार कोटी रुपयांचा महाप्रकल्प गुजरातमधील बडोद्यात होईल, असे गुरुवारी स्पष्ट झाले. महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरातील मिहान परिसरात एअरबस-टाटा यांचा हा संयुक्त प्रकल्प उभारला जाईल, अशी जोरदार चर्चा सुरू असताना हा निर्णय झाल्याने, वेदांत-फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याची टीका राज्यातील विरोधक करीत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम airbus tata
नागपूरचा प्रकल्पही गुजरातला! 'एअरबस-टाटा'ची रविवारी बडोद्यात पायाभरणी; वैदर्भीयांमध्ये नाराजी


संरक्षण सचिव अजय कुमार यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना या प्रकल्पाबाबतची घोषणा केली. भारतीय हवाई दलासाठी सी-२९५ जातीची मालवाहू विमाने उत्पादित करणारा हा प्रकल्प असून, खासगी कंपनीद्वारे लष्करासाठी विमाने उत्पादित करण्याचे हे देशातील पहिलेच उदाहरण ठरणार आहे. देशांतर्गत विमान उत्पादन क्षेत्राला या निर्णयामुळे मोठे बळ मिळणार आहे. या विमानातून सुमारे ७० जण प्रवास करू शकतील, तसेच सुसज्ज नसलेल्या धावपट्ट्यांवरूनही त्यांचे उड्डाण-उतरणे शक्य होईल, अशी माहिती हवाई दलाचे व्हाइस चीफ एअर मार्शल संदीप सिंग यांनी दिली. टाटांसोबत हा संयुक्त प्रकल्प उभारणारी एअरबस ही स्पेनची कंपनी आहे. या प्रकल्पाबाबत झालेल्या करारानुसार, येत्या चार वर्षांत स्पेनमधील एअरबसच्या प्रकल्पातून पूर्णतः तयार झालेली पहिली १६ विमाने हवाई दलास दिली जातील. त्यानंतर पुढील ४० विमाने टाटाद्वारे भारतात उत्पादित करून टाटाद्वारेच त्यांची जोडणी केली जाईल. या प्रकल्पाची पायाभरणी येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बडोद्यात केली जाणार आहे.

दरम्यान, टाटा-एअरबस प्रकल्प बडोद्यात होईल, या घोषणेनंतर राज्यातील विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज्य सरकारच्या अनास्थेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटून गुजरातकडे गेला, असे त्यांचे म्हणणे आहे. तर, हा प्रकल्प गुजरातमध्ये होईल, हे वर्षभरापूर्वीच ठरलेले होते व विरोधक यावर विनाकारण राजकारण करीत आहेत, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी रात्री काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना नमूद केले.

त्याचवेळी, या निर्णयामुळे विदर्भातील उद्योग वर्तुळात नाराजी पसरली आहे. वेदांत-फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्यातून गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बदल्यात मोठा प्रकल्प राज्यात येईल, असा दावा केला होता. त्यामुळे टाटा-एअरबसच्या प्रकल्पाची चर्चा सुरू झाली होती.

महत्वाचे लेख