म. टा. प्रतिनिधी, नागपूर
महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यात सत्तास्थापनेवरून ओढाचाढ सुरू आहे. सुरुवातीला दुष्काळ आणि त्यानंतर अवकाळी पावासाच्या तडाख्याने पिके उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अशात काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आणि अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदार संघाच्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी केलेले ट्विट चर्चेत आले आहे.
राज्यातील सत्ता आणि शेतीची परिस्थिती भीषण झालेली असताना अॅड. ठाकूर यांनी मंगळवारी ट्विटरवरून 'ऑल इज वेल आणि जे अपेक्षित आहे तेच होईल' अशी पोस्ट टाकली. त्यानंतर अॅड. ठाकूर यांच्या पोस्टवर काही क्षणातच प्रतिक्रियांचा पाऊस पडला. कुणी त्यांना 'माणिकरावांना आवरतं घ्या' असा सल्ला दिला, तर काहींनी 'तुम्हाला अमरावतीचे पालकमंत्री व्हायचेय का?' असा प्रश्न केला. बहुतांशी लोकांनी मात्र त्यांच्या या पोस्टवर नाराजी व्यक्त केली. 'ऑल इज वेल' असे असू शकते, असा प्रश्न अनेकांनी व्यक्त केला. 'स्वत:च्या स्वार्थासाठी काँग्रेस संपवू नका,' असा संतापही नेटकऱ्यांनी काँग्रेसच्या आमदारांना टोला लगावत व्यक्त केला. 'शरद पवारांपासून सावध राहा,'अशा इशारावजा प्रतिक्रियाही त्यांच्या पोस्टवर पडल्या होत्या.
चर्चांना उधाण
अॅड. ठाकूर यांच्या ट्विटवरून दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष असल्याचे अॅड. ठाकूर यांच्या या ट्विटचा अनेक जण आपापल्या पद्धतीने अर्थ लावत होते. मात्र, शेतकऱ्यांच्या दृष्टीने सध्याची राजकीय परिस्थिती 'ऑल इज वेल' नाहीच असे अनेकांचे म्हणणे होते.
.....