अ‍ॅपशहर

मुंबईत युतीशिवाय पर्याय नाही!: गडकरी

शिवसेना-भाजपमध्ये मुंबईच्या सत्तेसाठी रस्सीखेच सुरू असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना युतीच्या बाजूनं कौल दिला आहे. 'झालं गेलं विसरून मुंबईत शिवसेना-भाजपला एकत्र येण्यावाचून सध्यातरी पर्याय नाही,' असं मत गडकरी यांनी मांडलं आहे.

Maharashtra Times 24 Feb 2017, 2:17 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नागपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम alliance is only option for sena bjp in mumbai says gadkari
मुंबईत युतीशिवाय पर्याय नाही!: गडकरी


'झालं गेलं विसरून मुंबईत शिवसेना-भाजपला एकत्र येण्यावाचून सध्यातरी पर्याय नाही,' असं मत भाजप नेते नितीन गडकरी यांनी मांडलं आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं झालेला शिवसेना, भाजपचा सामना जवळपास बरोबरीत सुटला आहे. दोघांच्या जागांमध्ये केवळ २ जागांचे अंतर आहे. त्यामुळं दोन्ही पक्ष मुंबईत आपलाच महापौर बसणार, असे दावे करत आहेत. अपक्ष व छोट्या पक्षांना गळाला लावून मुंबई ताब्यात घेण्याचे दोन्ही पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं नेमकं काय होणार याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. सत्तेसाठी दोन्ही पक्षांमध्ये ही रस्सीखेच सुरू असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना युतीच्या बाजूनं कौल दिला आहे.

'शिवसेनेसोबत झालेली भाजपची युती ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली आहे. त्यांच्यात वैचारिक मतभेद नाहीत. निवडणुकीच्या काळात काही प्रमाणात मतभेद झाले असले तरी ते तितके टोकाचे नाहीत. त्यामुळं जे झालं ते विसरून मुंबईत शिवसेना-भाजपला एकत्र येण्यावाचून सध्यातरी पर्याय नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारपूर्वक हा निर्णय घ्यायला हवा', असं गडकरी म्हणाले.

महापौरपदाच्या वादाबाबत गडकरी यांनी सावध भूमिका मांडली. 'प्रत्येकालाच आपल्या पक्षाचा महापौर व्हावा, असं वाटतं. मात्र, फडणवीस आणि उद्धव हे दोघेही मॅच्युअर आहेत. ते योग्य निर्णय घेतील,' असंही ते म्हणाले.

युतीतील दुराव्याला 'सामना' जबाबदार

'भाजप, शिवसेना हे वेगळे पक्ष आहेत. दोघांना आपापली मतं आहेत. मात्र, मित्रपक्षाबाबत सातत्याने अपमानित होणारं लिखाण करणं योग्य नाही. पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांबाबत 'सामना'त सातत्यानं आक्षेपार्ह लिहिलं जातं, ते थांबायला हवं. शिवसेना-भाजपमध्ये दरी निर्माण होण्यासाठी 'सामना'च जबाबदार आहे. त्यामुळं मैत्री ठेवायची असेल तर जबाबदारीनं लिहावं लागेल,' असं गडकरी म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज