म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
राज्यात महाआघाडीची नव्याने मोट बांधण्यासाठी काँग्रेसकडून सुरू असलेल्या प्रयत्नात काँग्रेस नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने महाआघाडीच्या नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत वंचितचा समावेश करण्यासाठी काँग्रेसच्या प्रयत्नांना यश आले नाही. ८-१० जागांवर वंचितचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बसला. यावेळी परत तशी स्थिती उद्भवू नये, यासाठी नव्याने प्रयत्न चालले आहेत. महापुरामुळे आघाडी, युतीतील वाटाघाटी लांबल्या असल्या आतून तयारी सुरू आहे.
वंचितने चर्चेसाठी वेळ द्यावा आणि काँग्रेससोबत यावे, याबाबत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वंचितचे प्रणेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी सकाळी मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. येत्या २-३ दिवसात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी बैठक होऊन त्यांचा नेमका प्रस्ताव, काय अपेक्षित आहे, यावर चर्चा करण्यात येईल. त्यानंतर पक्षप्रमुख निर्णय घेतील, असे माणिकराव ठाकरे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रकार परिषद झाली असता, त्यांनी महाआघाडीबाबत बोलण्यास उत्सुकता दाखवली नाही, हे विशेष.