-काश्मिरातील परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांची माहिती
म.टा. वृत्तसेवा, यवतमाळ
'रमजानच्या पवित्र महिन्यात शांतता राहावी, यासाठी भारतीय लष्कर व पाकिस्तानी लष्करात डीजीएमओ स्तरावर चर्चा होऊन दोन्ही बाजूने शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला होता. काही काळ त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पण, पाकिस्तान शस्त्रसंधीचा भंग करीत असेल तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल. त्यांनी एक गोळी झाडली तर आपल्या बाजूने २५ गोळ्या झाडल्या जातील; पण पहिली गोळी त्यांचीच राहील', असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी शनिवारी रात्री येथे आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
'केंद्र सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सरकारच्या उपलब्धीची माहिती देण्यासाठी या पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. रमजान महिन्याचे पावित्र्य कायम राहावे, यासाठी या महिन्यात काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाया थांबविण्याचा निर्णय भारतीय लष्कराने घेतला आहे. पण, जर दहशतवाद्यांमुळे काश्मिरातील सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असेल व आपल्या जवानांचे जीवन धोक्यात येत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. केवळ दक्षिण काश्मीर वगळता उर्वरीत काश्मिरातील परिस्थिती सर्वसामान्य आहे', असे अहिर म्हणाले.
काश्मीरमध्ये शांतता राहावी, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तरुणांना रोजगार मिळत आहे. सुरुवातीच्या काळात लष्करावर दगडफेक करण्याऱ्या तरुणावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काश्मीरमधील प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी शासनाने दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती केली असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही अहिर यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार राजू तोडसाम, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजीव डांगे उपस्थित होते.