अ‍ॅपशहर

'आपले सरकार' कामच करेना; नागपूर जिल्ह्यातील अनेक केंद्रे नावालाच

जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज मागविण्यात येतात. तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून अर्जाची पडताळणी केली जाते. शासन निर्णयातील निकषानुसार आपले सरकार सेवा केंद्र वितरित करण्यात येते.

Authored byप्रवीण लोणकर | महाराष्ट्र टाइम्स 8 Jan 2023, 3:05 pm
नागपूर : जातीचा दाखला, प्रतिज्ञापत्र, उत्पन्न, डोमिसाइल, नॉनक्रिमिलेअर, रहिवासी अशा सुमारे ४०० प्रकारच्या सेवा ‘आपले सरकार’ केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांना सोयीचे व्हावे, यासाठी शहराच्या विविध भागांत अशी केंद्रे सुरू करण्यात आली. मात्र, ‘मटा’ने या केंद्रांची पाहणी केली असताना अनेक केवळ नावालाच आहेत. नागरिकांना कुठल्याच सेवा दिल्या जात नाहीत, हे वास्तव पुढे आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aple sarkar
'आपले सरकार' कामच करेना; नागपूर जिल्ह्यातील अनेक केंद्रे नावालाच


- आपले सरकार सेवा केंद्र जिल्हा प्रशासनाकडून वितरित करण्यात येते. यासाठी वर्षातून एकदा गरजेनुसार www.nagpur.gov.in या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाहिरात काढण्यात येते.

- जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज मागविण्यात येतात. तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून अर्जाची पडताळणी केली जाते. शासन निर्णयातील निकषानुसार आपले सरकार सेवा केंद्र वितरित करण्यात येते.

- यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही. केंद्र चालविण्यासाठी पुरेशी जागा असणे, गरजेचे साहित्य आणि तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे.

- आजच्या स्थितीला शहरातील विविध भागांत १६७ ‘आपले सरकार’ सेवा केंद्रे कार्यरत आहेत. ग्रामीण भागात २६९ केंद्रे असून प्रत्येक ग्रामपंचायतीत एक केंद्र आहे.

- ‘मटा’ने जागृतीनगर, मिलिंदनगर, गोपालनगर, सोमलवाडा, राणी दुर्गावतीनगर, इमामवाडा, माटे चौक, पांढराबोडी, कळमना वस्ती, नंदनवन या भागातील केंद्रांची पाहणी केली असता ते सक्रिय नसल्याचे आढळून आले.

- खासगी लिंकवरूनच काम करून दिले जाते आणि पैसे उकळले जात असल्याचा प्रकारही यातून पुढे आला.

...असे असावे सेंटर

-किमान पाच नागरिक बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात यावी.

-दरपत्रक दर्शनी भागात लावण्यात यावे.

-किती दिवसांत प्रमाणपत्र मिळेल, या माहितीचे फलकही लावण्यात यावे.

-करोनाचा काळ असल्याने सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

लूट सुरूच...

जातीचा दाखला, प्रतिज्ञापत्र, उत्पन्न, डोमिसाइल, नॉन क्रिमिलेअर, रहिवासी, शेतकरी, अल्पभूधारक, विशेष साहाय्य, केंद्राचा जातीचा दाखला, संजय गांधी निराधार योजना, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, ज्येष्ठ नागरिक या दाखल्यांसाठी ३३ ते ५७ रुपये एवढेच दर आकारावे, असे प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले आहे. या प्रमाणपत्रासाठीचे दरपत्रक केंद्रांवर लावणे अपेक्षित असताना अनेक केंद्रचालक त्याचे पालनच करीत नसल्याच्या तक्रारी आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्र बंद करण्यात आल्याने नागरिकांचा कल ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांकडे वाढला आहे. येथे सुविधा मिळण्यात अडचणी जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.

घरबसल्या होऊ शकते काम

नागरिकांना कोणत्याही दलालाकडे जाण्याची गरज भासू नये, यासाठी राज्य शासनाच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर घरबसल्या सर्व प्रमाणपत्रे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी संकेतस्थळावर जाऊन स्वत:चा युझर आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागतो. मात्र, ज्यांना ऑनलाइन ज्ञान नाही, त्यांच्यासाठी ‘आपले सरकार’ सेवा केंद्रे कार्यरत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज