म. टा. वृत्तसेवा, बुलडाणा
प्रति तिरुपती बालाजी मानल्या जाणाऱ्या देऊळगाव राजा येथील बालाजी व लक्ष्मीच्या विवाह सोहळ्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या श्री बालाजी महाराजांच्या ऐतिहासिक लळीत उत्सवाची शनिवारी; चतुर्थीला सांगता झाली. यावेळी 'लक्ष्मी रमण गोविंदा'चा एकच गजर करत लाखो भाविकांनी दर्शन घेतले.
तब्बल ३८० वर्षांपासून देऊळगावराजात व्यंकटेश बालाजी महाराजांचा उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात व आंध्र प्रदेश या राज्यातून लाखो भाविक नवस फेडण्यासाठी दाखल होतात. २६ ऑक्टोबर रोजी दिवसभरापासून उशिरा रात्रीपर्यंत लाखो भाविक मंदिरासमोर नतमस्तक होऊन भक्तिभावाने बालाजी व्यंकट रमण गोविंदाचा गजर करीत होते. लळीत उत्सवासाठी २१ खांबावर ४२ मंडप उभारण्यात आले होते. २७ ऑक्टोबर रोजी सूर्योदयाप्रसंगी पहाटे ५.४५ मिनिटांनी बोल 'गोविंदा गोविंदा ऽऽ'च्या गजरात लळीत महोत्सव साजरा करण्यात आला. भाविकांना शांततेत दर्शन घेण्यासाठी बाहेर ठेवण्यात आलेली बालाजी महाराजांची मूर्ती लळीत (लाटा)पडल्यानंतर पुन्हा मंदिरात ठेवण्यात आली.
व्यंकटेश बालाजी महाराजांचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक रात्रीलाच बालाजीनगरीत दाखल झाले होते. सर्वत्र भाविकांची गर्दी दिसत होती. लळीत उत्सव होताच बालाजी यात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रसाद म्हणून लाही, पोहे, मुरमुरे, गूळ, लेवडी, फुटाणे, साखर फुटाणे, बत्तासी, गोड शेव या सर्वांचे मिश्रण घेऊन भाविक प्रसाद म्हणून घेतात. या यात्रेत नामवंत फिरते चित्रपटगृह, आकाश पाळणे, राहाट पाळणे, सर्कस, रेल्वे इंजिन, महिलासाठी अष्टगंध, हळद कुंकू आणि बेंटेक्स बांगड्या, ज्वेलरी आदी साहित्यांची विक्रीसाठी दुकाने, तर बच्चे कंपनीकरिता लागणारी विविध खेळणी खेळण्यासाठी लागणारे साहित्यांचे दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली होती. लळीत उत्सवादरम्यान शहरात येणाऱ्या भाविकांसाठी सेवाभावी संघटनेच्यावतीने चहा पाणी, नास्ता, भोजन व सकाळी स्नान (आंघोळ) करण्यासाठी, राहण्याची व पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. देऊळगाव राजा बालाजीनगरीतील विविध सामाजिक संस्था व मित्रमंडळ, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच सेवाभावी संघटनांनी भाविकांना महाप्रसादाच्या माध्यमातून अन्नदान केले.