मध्य रेल्वे भारवाहक संघाचा काम बंदचा इशारा
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
ज्येष्ठ नागरिक, आजारी आणि दिव्यांगांच्या सोयीसाठी असलेल्या बॅटरी कारवर धडधाकट प्रवासी लगेज घेऊन जातात. त्यामुळे कुलींच्या हाताला काम उरले नाही. बॅटरी कारवर लगेज घेऊन जाण्यावर आळा घातला नाही तर काम बंद आंदोलन करू, असा इशारा मध्य रेल्वे भारवाहक संघाने दिला आहे.
पूर्वी जड बॅग्ज प्रवाशांना उचलता येत नव्हत्या. त्यामुळे त्यांना कुलींची मदत घ्यावी लागायची. यातून कुलींना रोजगार मिळायचा. मात्र, खालून चाके असलेल्या ट्रॉली बॅग्ज आल्या व त्याचा परिणाम कुलींच्या रोजगारावर झाला. आपली बॅग प्रवासी स्वत:च ओढत नेऊ लागले. भरीस भर आता रेल्वेस्थानकानर बॅटरी कार आल्या आहेत. त्यामुळे परिस्थिती आणखीच बिघडली. दिवसभर थांबून पोट भरण्यापुरते पैसेही मिळण्याची शक्यता नाही. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांच्यासाठी रेल्वे प्रशासनाने बॅटरी कारची सेवा सुरू केली आहे. बॅटरी कार सेवा घेण्यासाठी ५० रुपये शुल्क मोजावे लागते. त्यामुळे प्लॅटफॉर्मपर्यंत पायी चालत जाऊ शकतात, असे प्रवासीही ५० रुपये देऊन आपले सामान या बॅटरी कारवर पाठवतात. मग कुलींनी काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रकार रोजचाच झाल्याने कुलींपुढे पोटापाण्याचा प्रश्न उभा झाला आहे.
बॅटरी कारची सेवा घ्यायची असल्यास आधी दिलेल्या क्रमांकावर फोन करावा लागतो. त्यानंतर चालक येतो. ५० रुपये शुल्क घेतल्याची पावतीही प्रवाशाला देणे बंधनकारक आहे. मात्र, बॅटरी कारचालक ऑटोरिक्षाप्रमाणे प्लॅटफॉर्मवर व्यवसाय करतात. ज्येष्ठ नागरिक, आजारी आणि दिव्यांग प्रवाशांसाठी असलेल्या बॅटरी कारचा चालक गैरवापर करतात. बॅटरी कारमध्ये लगेजचा कुलींनी अनेकदा विरोध केला. समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला बॅटरी कार चालकाकडून कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. उलट बॅटरी कारचालक धमक्या देत असल्याचा आरोपही कुलींनी केला आहे. आमचा रोजगार वाचवा, अशी साद मध्य रेल्वे भारवाहक संघाच्यावतीने अध्यक्ष अब्दुल मजीद यांनी घातली आहे.