उपराजधानीतील स्थिती
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
आणीबाणीवरून भाजपने काळा दिवस जाहीर केल्यानंतर पक्षाच्या बड्या नेत्यांनी थेट दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या उपराजधानीत मात्र पक्ष नेत्यांना विरोधाचा विसर पडल्याचे दिसून येते.
इंदिरा गांधी २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू केली. त्याचा निषेध म्हणून भाजपने काळा दिवस जाहीर केला. आतापर्यंत आणीबाणीच्या विरोधात भाजपकडून टीका होत असली तरी यावेळी सर्वत्र आणीबाणी गाजत आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इंदिरा गांधी यांची हिटलरशी केलेली तुलना वादग्रस्त ठरली आहे. सोशल मीडियावरदेखील भाजप विरुद्ध काँग्रेस कार्यकर्ते असा वाद रंगला. त्यास प्रत्युत्तर म्हणून ट्विटरवर ट्रोल होत असलेल्या 'मोदी इमरजन्सी'वर काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले आहे. गेल्या चार वर्षांतील मोदी सरकारच्या निर्णयांचा उल्लेख करून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी संबंधित ट्विटवरूनही उजव्या विचारांच्या कार्यकर्त्यांकडून ट्रोल सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
काळा दिवस म्हणून नागपुरात भाजप नेत्यांनी एकही कार्यक्रम आयोजित केलेला नाही किंवा साधे निषेधाचे पत्रकही जारी केलेले नाही. आणीबाणीनिमित्त संघ वा भाजप विचारांच्या संघटनांनी यापूर्वी कार्यक्रम आयोजित केले. यावेळी असा कोणताही कार्यक्रम झाला नाही. आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याचा निर्णय राज्य सरकारने वर्षाच्या सुरुवातीला घेतला. आणीबाणीत एक महिन्यापेक्षा अधिक काळ कारावास भोगलेल्यांना दरमहा दहा हजार रुपये, त्यांच्या मृत्युपश्चात पत्नीला पाच हजार रुपये; तर, एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना दरमहा पाच हजार रुपये आणि त्यांच्या मृत्युपश्चात पत्नीला अडीच हजार रुपयांची पेन्शन देण्याचे सरकारने जाहीर केले. मात्र, आणीबाणीच्या दिवशी भाजपच्या कोणत्याही नेत्याकडून त्याचा उल्लेख झालेला नाही.