म.टा. प्रतिनिधी, नागपूर
'केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिंकवून देण्यात महिलांचा मोठा वाटा होता. त्याचप्रमाणे, राज्यातही भारतीय जनता पक्षाच्या विजयात महिला शक्ती निर्णायक राहणार आहे. महिला शक्तीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेच्या जोरावर भाजप २२० जागा जिंकणार,' असा दावा महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी बुधवारी पत्रपरिषदेत केला.
पक्षाच्या कार्याबाबत माहिती देताना रहाटकर म्हणाल्या,'महिलांसाठी सर्वाधिक योजना आणून, त्यांची अमंलबजावणी शेवटच्या स्तरापर्यंत करण्यात भाजपाला यश आले आहे. उज्वला योजना, अस्मिता, हिरकणी, माझी कन्या भाग्यश्री इत्यादी योजनांमधून महिला सशक्तीकरणाला बळकटीकरण मिळाले आहे. यासह 'कमल सखी संवाद' ही योजनाही राज्यातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहचविली आहे. महिलांकरीता विशेष उद्योग धोरण गेल्या पाच वर्षांत ठरविण्यात आले आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळात, तब्बल पन्नास लाख कुटुंब बचतगट चळवळीशी जोडल्या गेली आहेत. देशभरात आठ कोटी तर, महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक महिलांना उज्वलाचा लाभ मिळाला आहे. सर्वस्तरावर महिलांसाठी सकारात्मक वातावरण मिळाल्याने, महिला मतदार राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारला भरभरून मत देतील. त्यांच्याच बळावर राज्यात २२० सीट भाजपच्या पारड्यात पडणार आहेत.' पत्रपरिषदेदरम्यान भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यभरात दौरा करीत आहे. आज नागपूरात विविध ठिकाणी भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी माजी महापौर अर्जना डेहनकर उपस्थित होत्या.