रेल्वेची तत्परता; गेले नागपूरमार्गे
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
उपचारासाठी आवश्यक असलेले उंटिणीचे दूध या लॉकडाउनच्या काळातही रेल्वेच्या तत्परतेमुळे संबंधित रुग्ण मुलाला राजस्थानातून अवघ्या २८ तासांत पोहोचू शकले. नागपूरमार्गे ते गेल्याने येथील रेल्वे प्रशासनाचाही याकामी हातभार लागला.
उंटिणीचे दूध अतिशय पौष्टिक समजले जाते. मधुमेह, रक्ताल्पता, दमा, काविळ यांसारख्या अनेक आजारांवर औषध म्हणून उंटिणीच्या दुधाचा वापर होतो. मात्र, हे दूध मिळते ते राजस्थानात. त्याचे व्यावसायिक उत्पादन राजस्थानातच होते. आयुर्वेदात उंटिणीच्या दुधाचे महत्त्व सांगितले आहे. तेलंगणातील सिकंदराबाद येथील एक मुलगा गंभीर आजारी पडला. त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यांनी उंटिणीचे दूध मिळाले तर या मुलाला औषध देता येईल, असे सांगितले. हे दूध राजस्थानात मिळते. पण, ते राजस्थानातून तेलंगणात आणणे कठीण काम होते. त्यातही सध्याच्या लॉकडाउनमध्ये तर अगदीच अशक्य. कारण रेल्वेची प्रवासी वाहतूक व विमानसेवाही बंद. रेल्वेच्या पार्सल गाड्या असल्या तरी राजस्थानातून थेट सिकंदराबादसाठी सेवा नाही. तरीही त्याच्या पालकांनी प्रयत्न करण्याचे ठरविले. राजस्थानात फालना येथे हे दूध उपलब्ध असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी दूध उत्पादकांशी संपर्क साधला व त्यांना दूध पाठविण्याची विनंती केली. सध्या रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद असली तरी मालगाड्या व पार्सल गाड्या सुरू आहेत. पण, सिकंदराबाद ते फालना अशी थेट पार्सल गाडी नव्हती. मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य निरीक्षक जितेंद्र मिश्रा यांना याबाबत कळताच त्यांनी पश्चिम रेल्वेकडून फालना येथील पार्सल कार्यालयाचा क्रमांक मिळविला व तेथे संपर्क साधला. हे दुधाचे पार्सल मुंबईत वांद्रे स्थानकावर पाठविण्यास सांगितले. त्यानंतर हे पार्सल वांद्रे स्थानकावर येताच लगेच रस्तामार्गे ते सीएसएमटीला पाठविण्यात आले व तेथून दुसऱ्या पार्सल गाडीने लगेच सिकंदराबादला रवाना करण्यात आले. यासाठी औषधांच्या वाहतुकीचे विशेष सवलतीचे दर त्यांना लावण्यात आले. फालन्यावरून उंटिणीचे दूध सिकंदराबादला पोहोचायला २८ तास लागले. यात रेल्वेच्या विविध झोनमधील चार विभागांनी आपसात समन्वय साधला व एका रुग्णाला वेळेत त्याचे औषध त्याच्यापर्यंत पोहोचवून दिले. योग्य समन्वय असला तर एखादे अशक्य वाटणारे कामही कशा तत्परतेने होऊ शकते, याचे उदाहरण रेल्वेच्या या कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले आहे. याबद्दल वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. अलीकडेच २० दिवसांपूर्वीही अशाचप्रकारे राजस्थानातून मुंबईला उंटिणीचे दूध आले होते. त्यावेळीही अशीच तत्परता दाखविण्यात आली होती.