कॅप्टन विक्रम बत्रा यांचा भाऊ 'बत्रा टॉप'वर
वीस वर्षांनंतर वाहिली मृत्यूस्थळी श्रद्धांजली
वृत्तसंस्था, श्रीनगर
पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धात कॅप्टन विक्रम बत्रा यांना ज्या शिखरावर वीरमरण आले होते, त्याच शिखरावर चढाई करून विक्रम यांचे बंधू विशाल यांनी आपल्या भावाला श्रद्धांजली वाहिली.
१९९९ मध्ये कारगिल युद्ध सुरू झाल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या ताब्यातील प्रदेश मुक्त करण्यास सुरुवात केली होती. कॅप्टन विक्रम बत्रा यांना कारगिल क्षेत्रातील ५१४० क्रमांकाचे शिखर काबीज करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ते शिखर सर करताच विक्रम बत्रांना ४८७५ क्रमांकाचे शिखर सर करण्यास सांगण्यात आले होतं. या मोहिमेदरम्यान विक्रम बत्रा आजारी पडले. पण त्यानंतरही त्यांनी धैर्याने शत्रूचा सामना केला. ७ जुलै १९९९ला ४८७५ क्रमांकाच्या शिखरावर झालेल्या लढाईत विक्रम बत्रा शहीद झाले होते. त्यानंतर त्या शिखराचे नामकरण 'बत्रा टॉप' असे करण्यात आले.
रविवारी, ७ जुलै रोजी बरेाबर २० वर्षांनी विक्रम यांचे बंधू यांनी 'बत्रा टॉप' सर केला. या शिखरावर पोहोचताच विशाल यांनी आपल्या आई-वडिलांना फोन करून बत्रा टॉपवर पोहोचल्याची माहिती दिली. 'इथे माझ्या जागी विक्रम असायला हवा होता. विक्रम फक्त शरीराने फक्त आपल्यामध्ये नाही. मनाने मात्र तो इथेच आपल्यामध्ये हजर आहे,' अशा भावना विशाल यांनी ट्विटरवर व्यक्त केल्या.
विशाल बत्रा हेसुद्धा भारतीय लष्करात अधिकारी आहेत. कारगिल युद्धानंतर विशाल हे अनेकदा युद्धभूमीवर गेले आहेत. मात्र, बत्रा टॉपला भेट देण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. यावेळी लेफ्टनंट जनरल व्हीके जोशी आणि १३ जम्मू अॅंड काश्मीर रायफल्सचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.